

El Nino Climate Change
esakal
डॉ. रामचंद्र साबळ - sakal.avtaran@gmail.com
यंदाचा मॉन्सून केवळ उशिरा आलेला नाही, तर त्याची अनिश्चितताही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. हवामान बदल, पावसातील मोठे खंड आणि संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नियोजन आणि जलव्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे शेती, पिकांचे उत्पादन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पशुधन व्यवस्थापनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामागे केवळ ‘एल निनो’च नव्हे; तर वाढता हवामान बदल (क्लायमेट चेंज) हेही महत्त्वाचे कारण आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक ॲण्ड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेने यंदा ‘एल निनो’ सक्रिय होऊन त्याचा मॉन्सूनवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, युरोप, फिलिपाईन्ससह विविध देशांतील हवामान संस्थांनीही अशाच प्रकारचे अंदाज वर्तवले. भारतीय हवामान विभाग आणि इतर अनेक संस्थांनी आशिया खंडात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने एप्रिलपासूनच दुष्काळाच्या चर्चांना वेग आला. पुढे परिस्थिती अशी निर्माण झाली, की केवळ ‘एल निनो’ नव्हे; तर ‘सुपर एल निनो’ येणार असल्याचेही बोलले जाऊ लागले. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, शेती उत्पादनात घट, पिकांचे नुकसान आणि जलसंकट निर्माण होण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात आल्या.