

Montaigne Self-Reflection Philosophy
esakal
आत्मपरीक्षण ही माणसाची खरी ओळख आहे. त्यामुळेच मिशेल दे मॉन्टेग्ने यांनी आपल्या सर्व निबंधांमध्ये स्वतःलाच केंद्रबिंदू ठेवले आहे. ते म्हणतात, माणसाने जग समजण्यापूर्वी स्वतःला समजावून घेणे जास्त गरजेचे आहे. आपण जसे वागतो, जो विचार करतो, जे अनुभवतो त्याची प्रामाणिकपणे समीक्षा करणे म्हणजेच खरी विद्या. जग बदलण्यापेक्षा स्वतःला समजून घेणे हा मानवाचा पहिला प्रवास असायला हवा.
माणसाच्या प्रगतीचा आलेख आणि उत्क्रांतीविषयी जाणून घ्यायचे असेल तर त्याची सुरुवात नुसती मनुष्यप्राण्याचा अभ्यास करून होत नाही; खरेतर ती स्वतःपासून करावी लागते. जर तुम्हाला तुमच्याच जगण्याचा उलगडा होत नसेल, आपल्याच स्वत्वाचा पत्ता लागत नसेल तर अत्यंत अनाकलनीय, गूढ अशा उत्क्रांतीचा मागोवा घेऊनदेखील तुमच्या हाती काहीच लागणार नाही. आज आपल्या जगण्याच्या पद्धतीने आयुष्यात आरामदायीपणा आलाय खरा; पण त्यातून आपल्या अंगावरची चरबीदेखील अंमळ वाढलीच आहे. त्याबरोबरीनेच आपल्यात मोठ्या प्रमाणात अहंमन्यत्व विकसित झाले आहे. या अहंकारी बाण्यातून जेव्हा आपण विश्वाच्या आकाराचे माप काढायला जातो, तेव्हा आपल्या मूठभर चरबीपुढे अवघे विश्वदेखील छोटे वाटायला लागते. या अहंकारामुळे आपल्याला जगाचे वास्तव समोर असूनही वळत नाही. अहंकाराने जगाकडे पाहणारी माणसे त्यामुळेच कायम स्वत्वाच्या शोधात दिसतात. कारण आतून ती भित्री आणि असहाय्य असतात. बुद्धी कायम त्यांच्याभोवती एक प्रकारचा भ्रम निर्माण करीत असते. त्या भ्रमात जगणारी माणसे मानवी जाणिवेच्या प्रेममय लाटांचा अनुभव कधीच घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच उत्क्रांतीच्या प्रवासाला निघणे म्हणजे स्वतःच्या शोधात निघण्यासारखे आहे. या प्रवासात जसे स्वतःविषयीच्या शंकांचे निरसन होईल तसाच उत्क्रांतीचा प्रवास उलगडायला सोपा वाटेल. जेवढ्या स्वतःविषयीच्या शंका दुणावतील तेवढीच प्रवासातील क्लिष्टता वाढू शकते. तसे पाहिले तर डार्विनने आपल्यात उत्क्रांतीची बीजे रोवायचा प्रयत्न केला होता, असे मानले जाते; मात्र त्यापूर्वीदेखील अनेक विद्वानांनी माणूसपण उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. तो प्रत्येक प्रयत्न उत्क्रांतीच्या दिशेने जाणारे एक महत्त्वाचे पाऊल मानायला हवा.