

Marathi language crisis
esakal
एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल लागला आणि मराठीच्या अस्तित्वाची चर्चा पुन्हा सुरू झाली. मराठीत एकूण ९४ हजार विद्यार्थी नापास झाले होते. त्यात प्रथम भाषा घेतलेल्या ८० हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता. म्हणजे ते मराठीच असणार... अशी परिस्थिती असेल तर मराठी भाषेचं संवर्धन कसं होणार? कोणत्याही संस्कृतीचं सर्वात महत्त्वाचं माध्यम म्हणजे भाषा. त्या भाषेतून दिलं जाणारं शिक्षण म्हणजे तिच्या अस्तित्वाचा कणा असतो... तो जरा बळकट करण्याची गरज आहे.
आपण आपल्या मातृभाषेला फार हलक्यात घेत आहोत, असं मला वाटतं. ‘ती आपल्याला येतेच आहे... आपण ती बोलतोच’ असं मानून तिचं तंत्रशुद्ध शिक्षण घेण्याकडे आपला कल कमी होत चालला आहे. पालकांनीही आधीच ठरवून टाकलेलं असतं, की मराठी ही स्कोअरिंगची अर्थात अधिक गुण मिळवून देणारी भाषा नाही. त्यामुळे मुलांसमोर मराठी, संस्कृत आणि हिंदी असे पर्याय आले, की अनेकदा पालकच त्यांना संस्कृत किंवा हिंदी निवडण्याचा सल्ला देतात. मुलंही हा निर्णय बहुतांश वेळा स्वतःहून घेत नाहीत. खरं तर हिंदी ‘आपली भाषा नाही’ अशा भावनेतून शिकवली जात असल्यामुळे तिच्या ऱ्हस्व-दीर्घाकडे फार काटेकोरपणे लक्ष दिलं जातं; पण असं मराठीबाबत होत नाही. संस्कृतकडे तर परकीय भाषेसारखंच पाहिलं जातं आणि त्यामुळे तिचं मोठ्या प्रमाणावर पाठांतर केलं जातं. त्या घोकंपट्टीतून भरपूर गुणही मिळतात... पण संस्कृतमध्ये शंभरापैकी शंभर गुण मिळवणारा विद्यार्थीही त्या भाषेत चार वाक्यांचं सहज संभाषण करू शकेल का, याबाबत मी साशंक आहे. मराठीच्या बाबतीत मात्र अगदी उलट चित्र दिसतं. म्हणजे, ‘अतिपरिचयात अवज्ञा’ असं आपण जे म्हणतो तशी मराठी भाषा फार गृहीत धरली जाते. दुसरीकडे हिंदीला भरपूर गुण दिले जातात. संस्कृतला तेवढे दिले जात नाही; पण हिंदीबाबत हात मोकळा सोडला जातो.