
कशी झाली शेअर बाजाराची सुरुवात....
शेअर बाजार ही काही जणांना मालामाल होण्याची संधी वाटते तर काहींना जुगार. आज जगभरातले कोट्यवधी लोक शेअर बाजारात पैसै लावून पैसा कमवत आहेत. या शेअर बाजाराने अनेकांना कंगाल केले तर अनेकांना मालामाल. भारतात हर्षद मेहताच्या कारनाम्यांनी तर साऱ्या देशाची झोप उडवली होती. शेअर बाजाराचा हा प्रवास नक्की सुरु कसा झाला याची ही माहिती....(How Share Market started in the world)
एका अंदाजानुसार आज जगभरात लाखांहून अधिक कंपन्यांचे शेअर (Share Market) किंवा समभाग बाजारात आहेत. यापैकी बऱ्याच कंपन्यांचे व्यवहार कमी असले तरी अमेरिकेच्या न्यूयाॅर्क स्टाॅक एक्श्चेंज किंवा नॅसडॅक वर ४०००च्या आसपास कंपन्या शेअर व्यवहार करतात. भारतात (India) सुमारे आठ हजार कंपन्या एकतर नॅशनल स्टाॅक एक्श्चेंज किंवा बाँबे स्टाॅक एक्श्चेंजला नोंदणीकृत आहेत. या साऱ्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचा आकडा आकाशाला भिडणारा आहे.
या शेअर बाजाराचे किंवा सर्वसामान्यांना कंपनीचा भाग बनवायला सुरुवात नक्की कधी झाली, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. सोळाव्या शकतात पहिल्यांदा डच इस्ट इंडिया कंपनीने आपले समभाग बाजारात आणले. भारतीय महासागराच्या पूर्वेचा उपखंडाचा भाग हा इस्ट इंडिज म्हणून ओळखला जातो. १६०२ मध्ये डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिजमध्ये व्यापाराचे स्वामित्व हक्क या कंपनीकडे होते. Vereenigde Oostindische Compagnie म्हणूनही ही कंपनी ओळखली जाते. या कंपनीला नेदरलँडसच्या सरकारने मसाल्याच्या व्यापाराचे सार्वभौम हक्क दिले होते.
या कंपनीने व्यवसायाचे जे माॅडेल राबवले तो आजच्या आधुनिक जगातील व्यावसायिक जगताचा पाया म्हणावा लागेल. या कंपनीने आपल्या भांडवलासाठी बाँड आणि समभाग विकायला सुरुवात केली. मात्र, समुद्रीमार्गाने व्यापार होत असल्याने व्यापारात अनिश्चितता असायची. त्यामुळे मसाल्यांचे उत्पादन आणि त्यांची निर्यात यातल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारही अनिश्चित असायचे. याच काळात डच व्यापाऱ्यांनी ट्युलिप बल्बचा व्यवसाय सुरु केला. ट्युलिप फुलांचे कोंब खरेदी विक्रीचा हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर होता. त्यावेळी ट्युलिब बल्बच्या किंमती प्रचंड वाढल्या होत्या.
साहजिकच शेतकऱ्यांनी ट्युलिप कोंबांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु केले. १६३७ च्या फेब्रुवारी महिन्यात ट्युलिप बल्बची बाजारपेठ अत्युच्य पातळीवर पोहोचली होती. त्याच वेळी या कोंबांच्या किंमतीमुळे ग्राहक दूर जाऊ लागले. त्यामुळे किंमती निचांकी पातळीवर घसरल्या. यालाच 'ट्युलिप बबल' असे म्हटले जाते. शेअर बाजार कोसळण्याची ही जगातली पहिली घटना. तरीही डच इस्ट इंडिया कंपनी ही आपल्या भागधारकांना नियमित डिव्हिडंड देणारी जगातला पहिली कंपनी आहे. ही कंपनी आपल्या समभागाच्या किंमतीच्या १८ टक्के डिव्हिडंड आपल्या गुंतवणूकदारांना देत असे.
डच ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेबरोबरच जगातले पहिल्या स्टाॅक एक्श्चेंजची स्थापना झाली. अॅमस्टरडॅम स्टाॅक एक्श्चेंज हे जगातले पहिले स्टाॅक एक्श्चेंज. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या छापील समभागांचे व्यवहार या स्टाॅक एक्श्चेंजच्या माध्यमातून सर्वप्रथम सुरु झाले. वस्तु विनिमयाऐवजी कागदी समभागांचे व्यवहार करणारे हे पहिले स्टाॅक एक्श्चेंज मानले जाते. आजही हे स्टाॅक एक्श्चेंज पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. सध्या हे स्टाॅक एक्श्चेंज 'युरोनेक्स्ट अॅमस्टरडॅम' या नावाने ओळखले जाते.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”