तुमच्या गुंतवणुकीत ‘ईएसजी’ आहे का?
‘सकाळ मनी’च्या पहिल्या (२०१९) दिवाळी अंकामध्ये आपण ‘एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स’ (ईएसजी) ही कल्पना काय आहे आणि त्याचा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना काय फायदा असू शकतो, ते सविस्तर आणि सोदाहरण पाहाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळच्या लेखाचे शीर्षक होते, ‘गुंतवणूक करतांना आपण सामाजिक बांधिलकी कशी जपू शकतो?’. आपण ती जपली पाहिजे आणि तशी ती जपता येते, हे आपण पाहिले. यावेळच्या लेखाचे शीर्षक ‘तुमच्या गुंतवणुकीत ‘ईएसजी’ आहे का?’, असे आहे, कारण जर का आपल्या गुंतवणुकीत ‘ईएसजी’ नसेल तर ते आयोडीन नसलेल्या मिठासारखे होऊ शकते. समजा मिठामध्ये आयोडीन नसेल तर मिठाची चव बदलेल का किंवा त्याचा आपल्याला मोठा फरक पडेल का, तर त्याचे उत्तर जसे ‘नाही’ असे आहे; तसेच गुंतवणुकीत ‘ईएसजी’ नसल्याने आपली गुंतवणूक चुकीची होईल का, या प्रश्नाचे उत्तर जरी ‘नाही’ असे येत असले तरीसुद्धा, ती अपूर्ण ठरू शकते.