‘विस्मरणा’कडे नको दुर्लक्ष
‘जागतिक विस्मरण दिवस’ नुकताच पार पडला. त्यानिमित्त सप्टेंबरमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. भारतात या विषयाची जागरूकता वाढविण्याची गरज आहे.
‘विस्मरण’ हा उतारवयात जडणाऱ्या आजारांपैंकी एक महत्त्वाचा आजार. ‘वयोमानानुसार विसरायला होतच,’ हे पठडीतील वाक्य या आजाराच्या शास्त्रीय माहितीपासून आपल्याला दूर ठेवते. उतारवयात ‘विस्मृती’, ‘विस्मरण’, ‘स्मृतिभ्रंश’ होणारच... हे आपण गृहीत धरून चालतो. साहजिकच या अवस्थेतून जाणाऱ्या ज्येष्ठांना समजून घेणे, त्यांना सुरक्षित वातावरण देणे, मानसिक स्तरावर गुंतवून ठेवणे, एकटे न पडू देणे इत्यादी गोष्टींची काळजी घेणे आवश्यक ठरते. भारतात साठीच्या पुढील नागरिकांमध्ये ‘विस्मरण’ या आजाराचे सुमारे ५३ लाख रुग्ण असल्याचे ‘अल्झायमर्स ॲन्ड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया’ या संघटनेचे म्हणणे आहे.