अकबरच्या मुलाने अहमदनगरवर केला होता हल्ला...
सध्या औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ व्हावे या मागणीने पुन्हा डोके वर काढलेले असताना, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्याचेही नाव बदलून अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून ‘अहिल्यानगर’ असे करण्यात यावे अशी मागणी केली. त्यानंतर खऱ्याअर्थाने ऐतिहासिक म्हणल्या जाणाऱ्या या अहमदनगरचा नक्की इतिहास तरी काय? ‘अहमद’ या मुस्लिम राज्यकर्त्यांचे नाव नेमकं आपल्या जिल्ह्याला लागले तरी कसे? असे प्रश्न व त्यामागील इतिहास समजून घेण्याची इच्छा अनेकांना झाली असेल. नगरकर या नात्याने जेव्हा शहरातून फेरफटका मारत असतो, तेव्हा पदोपदी या शहराच्या दैदीप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला दिसत राहतात. मात्र त्या सर्व ऐतिहासिक वास्तूंमागील इतिहास मात्र खूप कमी लोकांना ठाऊक आहे. उभ्या महाराष्ट्राला ज्या औरंगजेबाने छळले त्याचा मृत्यू पाहण्याचे भाग्यही याच अहमदनगरमधील ‘भिंगार’ गावाला १७०७ मध्ये लाभलेले आहे. चला तर या शहराचा इतिहास समजावून घेवूयात.