अहिराणी गाण्यांचा सोशल मीडियावर बोलबाला!
कधीकाळी फक्त जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांसाठी मर्यादित असलेली अहिराणी गाणी आता राज्यभर वाजू लागली आहेत. अहिराणी गाण्यांमध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांमुळे आता भाषा आणि प्रांत मागे सोडत अख्ख्या राज्यात आणि राज्याबाहेरही आपली छाप टाकली आहे. त्यामुळे अहिराणी म्युझिक इंडस्ट्रीने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं असून खानदेशी गाणी म्युझिक चॅनेल्ससह सोशल मीडिया दणकू लागली आहेत. (Ahirani Songs getting popularity on social media)
अहिराणी म्हणजेच खानदेशची (Khandesh) मायबोली. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक (काही भागात) या जिल्ह्यांमध्ये अहिराणी भाषा बोलली जाते. आज या अहिराणी भाषेतील गाणी राज्यभर वाजवली जात आहेत. पूर्वी केवळ लग्नसराईतच (Marriage Function) खानदेशात अहिराणी गाणी ऐकली जायची. कारण, खानदेशातील अहिराणी भाषिकांना नाचताना या गाण्यांशिवाय ठेकाच धरता येत नाही. त्यामुळे लग्नसराईत अहिराणी गाण्यांना (Songs) प्रचंड मागणी असते. मात्र, आजघडीला अहिराणी गाण्यांचं वेड हे केवळ खानदेशपुरताच मर्यादित न राहता राज्यभर अन् राज्याबाहेरही गेलं आहे. सोशल मीडियामुळे अहिराणी गाण्यांच्या निर्मात्यांना एक चांगलं हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. त्यामुळे ते जगभर पोहोचू शकत आहेत.