‘‘मॅडम, अहो आमच्या प्रियाकडे जरा जास्त लक्ष द्या हं!!’’, ‘‘आमच्या सोहमला ए टू झेड यायला लागलं का हो!’’, ‘‘अहो, आमच्या देवांशला (वर्ष ३) ए, बी, सी, डी काढ म्हटलं, शिकवलं तरी त्याला अजून येत नाहीये हो, आता येईल का हो’’ अशा कधीही न संपणाऱ्या प्रश्न वारंवार शिक्षकांना विचारले जातायत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांच्या प्रदीर्घ ‘ब्रेक’नंतर संपूर्ण राज्यातीलच नव्हे, तर देशातील शाळा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होऊन महिना होत आला, तरी शाळांच्या परिसरात फेरफटका मारल्यास असे संवाद प्रामुख्याने कानावर पडत आहेत. कोरोनामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षण सुरू होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या मुलांच्या म्हणजे इयत्ता नववी ते बारावी म्हणा किंवा पाचवी ते बारावीच्या मुलांच्या शाळा २०२१मध्ये काही प्रमाणात टप्प्या-टप्प्याने सुरू झाल्या. परंतु प्राथमिक आणि विशेषत: पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थी तब्बल दोन वर्षांच्या ‘ब्रेक’नंतर पहिल्यांदाच शाळेत गेली.
ती यंदाच्या जूनमध्येच (जून २०२२). आपल्याकडे मुलं तीन वर्षांचे झाले की सर्वसाधारणपणे त्याला नर्सरीमध्ये टाकले जाते. त्यानंतर ज्युनिअर केजी, सीनियर केजी (लहान गट/मोठा गट) आणि त्यानंतर इयत्ता पहिली (म्हणजे खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षण) अशा पद्धतीने शाळा सुरू होते. मार्च २०२० या काळात पूर्वप्राथमिक शाळेतील नर्सरीला प्रवेश घेतलेले विद्यार्थी आता मोठ्या गटात, तर लहान गटात प्रवेश घेतलेली मुलं पहिलीला, तर मोठ्या गटातील मुलं दुसरीला आणि इयत्ता पहिलीतील मुलं तिसरीला असणार आहेत. यातील अनेकांची यंदा शाळेत जाण्याची ही पहिलीच वेळ होती.