खान्देश(Khandesh) म्हटलं की डोळ्यासमोर येतात जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्हे. तापी नदीच्या खोऱ्यात आणि सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेली. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि गुजरातच्या सीमांनी बंदिस्त झालेला भू भाग. जशी या प्रदेशातील भाषा भिन्न तशी, या प्रदेशांना लागून असलेल्या खान्देशातील जिल्हे व तालुक्यांतील भाषा भिन्न. चाली-रिती भिन्न. प्रथा-परंपरा भिन्न. इतकेच नव्हे तर इथली खाद्यसंस्कृतीसुद्धा भिन्न. त्यामुळे खान्देश हा भू भाग एक असला तरी, त्यातील खाद्य संस्कृती ही भिन्न भिन्न आढळते. प्रत्येक भागात जशी बोली बदलत जाते, तसे खाद्य पदार्थही बदलत जातात. त्यामुळे खान्देशी खाद्यपदार्थांचे वेगळेच महत्त्व आहे. त्यांची वेगळीच चव आहे. त्यामुळेच ते केवळ खान्देशातच नव्हे तर, त्या बाहेरच्या प्रदेशातही प्रसिद्ध आहेत. त्यासाठी मूळचे खान्देशी असलेले मात्र, नोकरी- धंदा- व्यवसायानिमित्त देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यात स्थायिक झालेल्या नागरिकांमुळे आजही टिकून आहे. त्यामुळेच पुणे, पिंपरी-चिंचवड सारख्या भागातही खान्देशी पदार्थांची रेलचेल आहे. यात प्रामुख्याने मांडे, भरीत-पुरी, कळण्याची भाकरी व ठेचा आणि वरण-बट्टी, वांग्याची झणझणीत भाजी यांचा समावेश आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई अशा शहरांमधील हॉटेलमध्ये हे पदार्थ सहज मिळत आहेत. काही हॉटेल्स केवळ या पदार्थांसाठीच प्रसिद्ध आहेत. (Khandeshi Food mande Bharit puri bhakri techa)