कोकण कड्यावरुन निसर्गाचा हा नजारा पाहिलात का?
तुम्ही कधी जिवंत माणसाच्या पडणाऱ्या सावलीभोवती इंद्रदेवाप्रमाणे रंगबेरंगी वर्तुळे पडलेली पाहिली आहेत का? नसेलच पाहिली.. परंतु, हा अगदी स्वप्नवत वाटणारा चमत्कार आपल्या सह्याद्री डोंगर रांगेत अनेकदा पाहायला मिळतो. निसर्गाच्या याच अभूतपूर्व चमत्काराचे नाव म्हणजे ‘‘‘इंद्रवज्र’’! चला तर मग, निसर्गाच्या याच चमत्काराबद्दल आज जाणून घेऊयात.
सह्याद्रीतील भटकंती हा माझा आवडता छंद, तसा तो आपणापैकी बऱ्याच लोकांचा असेल. तर याच छंदातून आजवर अनेक कड्यांवर व त्या कड्यांवरील गडकोटांवर जाण्याचा योग आला. आपल्या सह्यगिरी पर्वत रांगेचे सौदर्य हे प्रत्येक ऋतूमध्ये बदलत असते, उन्हाळ्यात एरवी शांत असणाऱ्या कडेकपाऱ्या पावसाळ्यात तितक्याच रौद्र आणि माझ्या परिभाषेत सुंदर होतात. पावसाळ्यात हिरवा शालू पांघरलेले हे कडे आपल्या खांद्यावरून धबधब्यांना वाहते करतात. ही तीच वेळ असते ज्यावेळी या कड्यांच्या उंचीसमोर ढगही खुजे होतात, अन याच दिवसांत दिसते, इंद्रवज्र..!