Bangladesh Liberation Day 2021 : १९७१चा बांगलादेश मुक्तिसंग्राम म्हणजे भारताने स्वत: पुढाकार घेऊन लढलेले पहिलेच युद्ध ठरले. राजकारण, मुत्सद्देगिरी आणि लष्करी क्षमतांचा अनोखा मिलाफ या युद्धात दिसला. पूर्व लडाखमध्ये २०२०मधील चीनबरोबरच्या संघर्षामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तानबरोबरच चीनबरोबरच्या सीमेवरही विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी, एकात्मिक राष्ट्रीय दृष्टिकोनाची गरज असून, बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे धडे गिरवायला हवेत.
-जनरल दीप हुडा
Bangladesh Liberation Day 2021 : आपण १९७१ च्या बांगलादेश (Bangaladesh) मुक्तिसंग्रामाचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहोत. त्यामुळे, या युद्धात भारताने (india) नेत्रदीपक विजय कसा मिळविला आणि त्याची सध्याच्या वर्तमानातील प्रासंगिकता काय, याचा ऊहापोह करणे गरजेचे ठरते. बांगलादेशला स्वतंत्र (Indepandace of Bangaladehs) करण्यासाठी भारताने स्वत:हून पुढाकार घेऊन अत्यंत सुनियोजित पद्धतीने केलेले हे पहिलेच युद्ध होते. यापूर्वीची १९४७, १९६२ आणि १९६५च्या युद्धांना शत्रूने सुरुवात केली होती आणि युद्धाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतीय लष्कर प्रत्युत्तराच्या भूमिकेत होते.
राष्ट्रीय हेतू साध्य करण्यासाठी राजकारण, मुत्सद्देगिरी आणि लष्करी क्षमतांच्या मिलाफाचे १९७१चे युद्ध (1971 War) उत्तम उदाहरण होते. या युद्धाच्या स्मरणार्थ आयोजित ‘स्वर्णिम विजयवर्ष’ परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले, ‘‘भारतीय मुत्सद्यांनी पूर्व बंगालमधील लोकांची दुर्दशा जगभरात पोहोचवली. अवघ्या चार महिन्यांतच भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर ४०पेक्षा अधिक वेळा याबाबत आवाज उठविला. बांगलादेशातील परिस्थितीकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय परिषदांचेही आयोजन केले. सप्टेंबर १९७१मध्ये यातील शेवटची परिषद पार पडली. या परिषदेत २४ देशांतील १५० प्रतिनिधी सहभागी झाले होते.’’ भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानभोवती (सध्याचा बांगलादेश) मोठ्या प्रमाणावर सैन्य, नौदल व हवाई दल जमा केले. यातच पाकिस्तानने पश्चिमेकडे ३ डिसेंबर १९७१ रोजी कारवाया सुरू केल्या. मात्र, त्यामुळे भारतीय लष्कराने पूर्वेकडील आघाडीवरील आपले लक्ष्य विचलित होऊ दिले नाही. अगदी अमेरिकेच्या नौदल ताफ्याने ‘यूएसएस एंटरप्राइझ’ या विमानवाहू युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली भारतावर दबाव आणण्यासाठी बंगालच्या उपसागरात प्रवेश केला तेव्हाही, पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करून नवीन देशाची निर्मिती करण्याच्या ध्येयापासून भारतीय लष्कर मागे हटले नाही. बांगलादेश मुक्ती संग्रामामुळे दक्षिण आशियात लष्करी सत्ता म्हणून भारताचा उदय झाला. याशिवाय, सशस्त्र भारतीय दलांच्या व्यावसायिकतेवरही शिक्कामोर्तब झाले. भारतीय लष्कराने जिनिव्हा कराराचे काटेकोर पालन करत युद्धातील ९३ हजार पाकिस्तानी कैद्यांना चांगली वागणूक दिली. लष्कराची ही कृतीही प्रशंसनीय ठरली.