

Rupee depreciation impact India
sakal
विशाखा बाग-gauribag7@gmail.com
सध्या रूपयाची पडझडीच्या बातम्या सतत येत आहेत. सर्वसामान्य माणसाला याचा वास्तविक अर्थ कळायला किंवा त्यांच्या आयुष्यात या घडामोडींचा परिणाम जाणवायला बराच वेळ लागतो आणि त्यामुळे नेमकी रुपयाची पडझड म्हणजे काय? रुपयाचे मूल्य (व्हॅल्यू) का कमी होते? रुपयाचे मूल्य कशामुळे ठरवले जाते? आणि रुपयाची पडझड होत असताना, भारतीय रिझर्व्ह बँक यामध्ये महत्त्वाची कोणती भूमिका बजावते, हे बघू या.
भारताची सध्याची परिस्थिती खरे तर वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’च्या दरापासून ते शेअर बाजारापर्यंत सुखावणारीच आहे. भारत सरकारने परदेशी संस्थानिक गुंतवणूकदारांसाठी व्यवसाय करण्यासाठी किंवा भागीदार होण्यासाठी म्हणून नियमांची शिथिलता करून लालफितीमध्ये न अडकवता ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ सुरू केलेच आहे. त्याचबरोबर सध्या महागाईचा दर कमी असणे, ‘जीडीपी’मध्ये बऱ्याच अंशी सुधारणा होणे, भारताकडे ६८९ अब्ज डॉलर परकी गंगाजळी असणे, चालू खात्यातील तूट ठीकठाक असणे अशा बऱ्याच गोष्टी भारताच्या बाजूने आहेत. परंतु, अमेरिकेबरोबरचे ताणले गेलेले व्यापार संबंध, जगात सर्वांत जास्त म्हणजे ५० टक्के हा अमेरिकेने भारतावर लावलेला कर; त्याचबरोबर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारताकडे कमी केलेला गुंतवणुकीचा ओघ, भारतीय शेअर बाजारांमधून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक, जपानच्या मध्यवर्ती बँकेने वाढविलेले व्याजदर आणि यामुळे डॉलरच्या तुलनेतसुद्धा ‘येन’ या चलनाचे वाढलेले मूल्य, परदेशी कर्ज घेतलेल्या भारतीय गुंतवणूकदारांना यामुळे बसणारा फटका आणि सर्वांत मुख्य कारण म्हणजे भारतीय शेअर बाजारामध्ये ‘आयपीओ’चा वाढलेला दबदबा त्यामधून मिळणारे झटपट उत्पन्न याची लालसा परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनासुद्धा पडली आहे. त्यामुळे असे गुंतवणूकदार बाजारात कमी काळासाठी पैसा लावून त्यावर जास्त परतावा मिळवून भारतीय बाजारातून बाहेर पडत आहेत. या सर्व गोष्टींचा फटका रुपयाच्या मूल्याला बसतो आहे.