

Arthur Road Jail reforms Mumbai
esakal
जयेश शिरसाट
कारागृह म्हटले, की अंधाऱ्या कोठडीत खितपत पडलेले कैदी असेच चित्र डोळ्यासमोर येते. निकृष्ट दर्जाचे अन्न, अस्वच्छता, अट्टल गुन्हेगारांची सोबत, सुटकेची आस आणि नव्याने आयुष्य घडवण्याचे आव्हान अशा परिस्थितीचा सामना प्रत्येक बंदीवान तुरुंगात करत असतो; पण आर्थर रोड कारागृह प्रशासनाने विविध प्रयोगांच्या माध्यमातून कैद्यांना तुरुंगातूनच परिवर्तनाचा मार्ग दाखवला आहे. कारागृहाचे रूपांतर त्यांनी अक्षरशः सुधारगृहात केले आहे.
तुरुंगाच्या उंच आणि भरभक्कम भिंतींआडच्या दुनियेबाबत बाहेर प्रचंड कुतूहल असते. म्हणूनच की काय, तुरुंगातून सुटलेल्यांकडून आतील दिनचर्येचे वेळापत्रक, जेवण, स्वच्छता, सुखसोयी, करमणूक, मानवी हक्क, कैद्यांच्या टोळ्या, टोळीयुद्ध, गुन्हे, आतून निसटण्याचे प्रयत्न, कट, पोलिसांची वागणूक आदी अनुभव चवीने ऐकले जातात. अशाच अनुभवांच्या आधारे जागतिक स्तरावर अनेक पुस्तके व कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आणि रोमांचकारी चित्रपटही तयार झाले.