भविष्यात होणाऱ्या नातवंडांना संपत्ती देता येते का? काय आहे मृत्युपत्राचे नियम जाणून घ्या

इच्छापत्रात लिहिलेली मिळकत ही इच्छापत्र करणाऱ्याच्या मिळकतीचा भाग राहते आणि मग काही सूचना लिहून ठेवली नसल्यास नैसर्गिक वारसांमध्ये समान वाटली जाते.
Legal will
Legal willEsakal

अॅड. सायली गानू- दाबके

माझ्या मुलाने आमच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला आहे. आतादेखील आमचे मुलगा व सुनेशी फारसे संबंध नाहीत. जेवढे आहेत ते औपचारिक आहेत. त्यांना अजून तरी मूलबाळ नाही. मला माझ्या संपत्तीतील काहीही सुनेला देण्याची इच्छा नाही. मुलगा आणि नातवंडे झाली तर त्यांना काही द्यायचा विचार आहे. तर मी इच्छापत्र करणे गरजेचे आहे का? असे इच्छापत्र केल्यास मला त्यात सुनेला काही मिळू नये यासाठी काही अटी घालता येतात का?

तुम्ही हिंदू (स्त्री किंवा पुरुष) असाल तर तुमच्या नैसर्गिक वारसांमध्ये फक्त मुलाचा समावेश होतो. त्यामुळे तुम्ही विल केले नाही तर फक्त तुमच्या मुलाला तुमच्या स्वतंत्र आणि स्वकष्टार्जित मिळकतींमध्ये हक्क मिळेल, सुनेला नाही. मुलाचा हक्क इतर वारसांच्या बरोबरीने असेल. नातवंडाला आपोआप काही हक्क मिळणार नाही.

त्यामुळे मुलाला इतर वारसांच्या बरोबरीने हक्क तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही विल /इच्छापत्र केले नाही तरी चालेल. परंतु तुम्हाला मुलाला काही विशिष्ट मिळकती द्यायच्या असतील आणि नातवंडांनादेखील काही द्यायचे असेल तर तुम्हाला इच्छापत्र करावे लागेल.

तुमच्या इच्छापत्रात तुम्ही तुम्हाला हव्या तशा सूचना लिहून ठेवू शकता आणि काही अटीही घालू शकता. कायद्याच्या कसोटीवर टिकणाऱ्या अटी इच्छापत्रात घातल्या तर चालतात.

काही अटी मात्र अवैध धरल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी होत नाही. वारसाहक्क मिळण्यासाठी अवैध किंवा अनैतिक कृती करण्याची अट घातली असल्यास विलमधील ती अट आणि देणगी अवैध धरली जाते.

उदाहरणार्थ, मुलाने पत्नीस घटस्फोट दिला तरच त्याला मिळकतीत हक्क मिळेल अशी अट; किंवा तुमच्या मुलाचे लग्न तुम्हाला पसंत नसलेल्या व्यक्तीशी झाले आहे.

त्यामुळे तुमच्या मुलाचे तुमच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न झाले असेल तरच त्याला काही मिळकत/ हक्क मिळेल अशी अट आदी. तसेच मुलाला मिळकत एकदा मालकीहक्काने दिल्यावर त्याने त्याचा वापर कसा करावा यावरही खूप निर्बंध घालता येणार नाहीत.

माझ्या मुलीचे याच वर्षी लग्न झाले असून तिला अजून मूलबाळ नाही. विल करताना, मला भविष्यात जी नातवंडे होतील त्यांना काही देण्याची इच्छा आहे. अशी सूचना मला माझ्या इच्छापत्रात लिहिता येईल का? जर इच्छापत्रात अशी सूचना लिहिली आणि मला नातवंडे होण्याआधीच इच्छापत्राच्या अंमलबजावणीची वेळ आल्यास काय होईल?

ज्या व्यक्तीला इच्छापत्रामध्ये लाभार्थी म्हणून नेमले आहे अशी व्यक्ती इच्छापत्र करताना अस्तित्वात नसली, तरी इच्छापत्राच्या अंमलबजावणीच्या वेळी अस्तित्वात असणे आवश्यक असते.

जर अशी व्यक्ती किंवा वारसांचा असा नेमलेला गट (उदाहरणार्थ, जर तुम्ही माझी त्या वेळी असलेली नातवंडे असा गट लिहिलात तर) विल करणाऱ्याच्या मृत्यूच्यावेळी अस्तित्वात आलेच नसतील तर त्यांच्या नावे इच्छापत्रात लिहिलेली मिळकत ही इच्छापत्र करणाऱ्याच्या मिळकतीचा भाग राहते आणि मग काही सूचना लिहून ठेवली नसल्यास नैसर्गिक वारसांमध्ये समान वाटली जाते.

अशी शक्यता लक्षात घेऊन अशा शिल्लक मालमत्तेच्या बाबतीत पण स्पष्ट सूचना लिहून ठेवल्यास योग्य ठरते. उदाहरणार्थ, मला अशी नातवंडे नसल्यास ही मालमत्ता ‘अमुक’ व्यक्तीला मिळावी असे लिहून ठेवावे.

महत्त्वाचेः या लेखमालेत प्रश्‍नकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारावर उत्तरे देण्याचा प्रयत्न आहे. तरी या उत्तरांना कायदेशीर सल्ला समजू नये. या उत्तरांच्या आधाराने कुठलेही कायदेशीर पाऊल उचलू नये. आपले प्रश्न व शंकांबद्दल वकिलांचा सल्ला घेऊनच योग्य ती कृती करावी.

--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com