वाड्याच्या दारात उभं राहिलं की आमच्या वरच्या आळीपासून ते पार खालच्या आळीच्या टोकापर्यंतच्या सगळ्या गुढ्या दाराबाहेर दिमाखात उभ्या दिसायच्या. मग प्रत्येक दारापुढची रांगोळी, कुणाची गुढी सगळ्यात उंच आहे बघण्यात दुपार व्हायची.
जेवायची वेळ झाली की घराघरातून गोडाचा; कुरडया, पापड तळणीचा घमघमाट सुटायचा आणि सगळ्या मुलांची पावलं आपसूकच घराकडे वळायची. बहुतेक घरी श्रीखंडाचाच बेतच असायचा.
एक मैत्रीण सांगते, श्रीखंडात द्राक्षपण घालतात हे मला नानांकडूनच समजलं. अर्थातच आज २०-२५ वर्षांनीही तिची ती आठवण ताजी आहे आणि श्रीखंडही तिला तसंच हवं असतं, हे विशेष.