

COP 30 Climate Change Conference
esakal
अपेक्षित घडले नाही म्हणून निराशा वाटणे साहजिक असले, तरी केवळ करारावर सर्व काही अवलंबून नसते. जागतिक पातळीवर हवामान चळवळीची नवी घडी बसविण्यासाठी आवश्यक असलेली चर्चेची व विचारांची पार्श्वभूमी तयार होणेही तितकेच आवश्यक असते. चर्चेच्या बीजांना खतपाणी देऊन प्रत्यक्ष, कठोर आणि व्यापक कृती कधी दिसणार, हा खरा मुद्दा आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात तीव्र बदल होत असून त्याचा फटका अनेक वर्षांपासून अनेक प्रदेशांना बसत आहे. विकसित देशांनाही याची झळ बसत असली, तरी अमाप पैसा असल्याने त्यांच्याकडे खबरदारी घेण्याचे आणि निवारण करण्याचेही अनेक उपाय व तंत्रज्ञान आहे. गरीब किंवा अविकसित देशांमध्ये मात्र अशा तीव्र बदलांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. या तीव्र हवामानाची झलक विकसित देशांना दाखवावी, या उद्देशाने यंदाच्या हवामान बदल परिषदेचे यजमानपद असलेल्या ब्राझीलने बेलेम या शहरात या परिषदेचे आयोजन केले होते. हे शहर म्हणजे ॲमेझॉन जंगलाचे ब्राझीलमधील प्रवेशद्वार मानले जाते. यजमानांची अपेक्षा काही प्रमाणात पूर्णही झाली. परिषद सुरू असतानाच जोरदार पाऊस पडून काही प्रवेशद्वारांपाशी पाणी साचले होते. संकटाची एवढी तीव्र जाणीव असलेल्या आणि त्याचा फटकाही बसत असलेल्या ब्राझीलला या परिषदेच्या अंतिम करारात मात्र हवामान बदलाविरोधात ठोस उपाययोजना किंवा कार्यक्रम निश्चित करता आला नाही. त्यामुळे ही परिषद अयशस्वी ठरली, असा दावा अनेक देशांनी केला.