

Nifty stock market
esakal
इतके दिवस निफ्टीला, बँक निफ्टीचा आधार होता. तो अचानक निघून गेल्यामुळे आणि त्यात माहिती-तंत्रज्ञान, वाहन उद्योग, बांधकाम क्षेत्र अशा साऱ्यांनीच पाठ फिरवल्यामुळे निफ्टी दिशाहीन झाली नाही तरच नवल! हेल्थकेअर व फार्मा क्षेत्र, तसेच रसायन क्षेत्र व कॅपिटल मार्केटशी संलग्न क्षेत्र डोके वर काढत आहे. पण निफ्टीला वर खेचण्याचे बळ त्यांच्यात नाही.
गेली दोन वर्षे परदेशी संस्था भारतीय बाजारावर रुसल्या आहेत. अव्याहत विक्री सुरू आहे. गेल्या चोवीस महिन्यांत त्यांनी चार लाख कोटी रुपयांची शेअर विक्री केली आहे. ही अनन्यसाधारण आहे. असे अचानक काय व्हावे?
जून २०२४मध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले, पण बहुमत मिळण्यासाठी इतर पक्षांचा टेकू घ्यायला लागला. तिथे पहिली माशी शिंकली. आता कदाचित पायाभूत सुविधांवर खर्च करणे मागे पडेल आणि तडजोडीचे राजकारण होईल, असे विश्लेषकांनी गृहीत धरले आणि तसेच झाले. इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवरील खर्चाची तरतूद कमी झाली आणि प्रत्यक्षात खर्च त्याहून कमी झाला. त्याजोडीला कंपनी कामकाज मंदावले. २०२३-२४ आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांच्या नफ्यात लक्षणीय वाढ झाली आणि निफ्टी ५००मधील कंपन्यांचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत (YoY) सुमारे ३० टक्क्यांनी वाढून १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. निफ्टी ५०० कंपन्यांचे निव्वळ नफा-जीडीपी गुणोत्तर ४.८ टक्क्यांवर पोहोचले, तर सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे गुणोत्तर ५.२ टक्क्यांवर जाऊन तेदेखील गेल्या १५ वर्षांतील सर्वोच्च होते. या तुलनेत आदल्यावर्षी दहावीत बोर्डात आलेला मुलगा पुढील वर्षी नापास व्हावा तसे झाले. २०२४-२५चा कॉर्पोरेट नफा जेमतेम तीन टक्के वाढला. साहजिकच बाजार महाग झाला आणि परदेशी संस्थांनी विक्री सुरू केली. पुढे प्रत्येक तिमाहीनंतर कंपनी कामकाज सुधारत गेले, पण त्यात पूर्वीचा दिमाख नव्हता. त्यामुळे विक्री सुरूच राहिली. अजूनही कामगिरीचे पूर्वीचे शिखर आलेले नाही. आता मार्च २०२६च्या निकालांची वाट बघावी लागणार आहे. कदाचित सुधारणा होईल, म्हणजे होतेच आहे, पण ती ‘त्यांच्या’ पसंतीस उतरली पाहिजे.