

Peggy Mohan Book on Language History
esakal
चिन्मया सुमंत-कुलकर्णी
भाषेचा विकास हा प्रत्येक भाषेतील साहित्य, त्या भाषांमधील स्पर्धा, त्यात टिकून राहण्यासाठी केलेले प्रयत्न, या प्रयत्नांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप आणि भाषेची ओळख टिकवून ठेवणे या सगळ्या महत्त्वाच्या पैलूंवर अवलंबून असतो आणि याच सगळ्या बाबी लेखिकेने भारतीय भाषांची अनोखी कहाणी या पुस्तकात सविस्तरपणे मांडल्या आहेत.
भारतातील असंख्य भाषा आणि पिढ्यान्पिढ्या त्या भाषांमधून संवाद साधत आलेले लोक... भारतातील भाषावैविध्य इतक्या प्रचंड प्रमाणात आहे, की या सगळ्या भाषांची मुळे, विविध लोकांच्या सहवासातून भाषांची होत गेलेली सरमिसळ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नवीन बोलीभाषा, हे सगळे होत असताना नव्या लोकांनी प्राचीन भूमीशी जुळवून घेताना आपल्या इतिहासाच्या काही भाषिक पाऊलखुणा मागे ठेवल्या आहेत का? हे तपासून बघणे हा भारतीय भाषांची अनोखी ओळख हे पुस्तक लिहिण्यामागचा लेखिकेचा हेतू.
भाषांचे मिश्रण या विषयाशी लेखिकेचा म्हणजेच पेगी मोहन यांचा पहिलवहिला संबंध आला तो युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टइंडीजमध्ये पदवीपूर्व विद्यार्थिनी म्हणून शिकत असताना. लहानपणापासूनच बहुभाषी असणे हे तिचा यातील उत्साह वाढवणार ठरले. एकाच झाडातून फुटणाऱ्या नवनव्या फांद्या जशा वाढतात, तशाच प्रकारे भाषा वाढत नाहीत, तर एका झाडावर दुसऱ्या झाडाचे कलम करावे आणि एकाच झाडाने अनेक फळे द्यावीत, अशा पद्धतीनेही भाषा विस्तारते. आपल्या डोळ्यांसमोर घडलेली भाषेची उत्क्रांती आणि त्यातून विस्तार पावलेल्या भाषा म्हणजे क्रिऑल भाषा. अशा काही भाषिक संकल्पना लेखिकेने पुस्तकात स्पष्ट केल्या आहेत.