जेव्हा एखाद्या इजेमुळं किंवा शस्त्रक्रियेच्यावेळी केलेल्या कापाकापीमुळं प्रमाणाबाहेर रक्तस्राव होतो, तेव्हा शरीरात बाहेरून रक्त चढवावं लागतं. रक्तदान करण्यासाठी अनेकजण पुढं येतात, पण मानवी शरीर सगळ्यांचंच रक्त स्वीकारत नाही. कारण या रक्तपेशींच्या बाहेरच्या आवरणावर त्यांचं ओळखपत्र असणारे रेणू असतात.
ते वाचल्यावर रक्त परकीय असल्याची जाणीव लिम्फपेशींना होते. ते त्या रक्ताला आपलं मानत नाहीत. ते भलेही मदतीला धावून आलेलं असलं, तरी त्याला घालवून दिल्याशिवाय यंत्रणा स्वस्थ बसत नाही. त्यामुळंचं आपल्या आधार कार्डशी मिळतं जुळतं, त्याच रक्तगटातलं रक्त असल्याशिवाय ते स्वीकारलं जात नाही.