ओंकार धर्माधिकारी
चालताना कर...कर...कर... असा आवाज करत एखादा रांगडा गडी निघाला, की आपसूक सर्वांच्या नजरा त्या दिशेला वळतात. त्या आवाजानंच त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली असते. त्याच्या पायात असलेल्या कलात्मक कोल्हापुरी चपलेची अनोखी दुनिया जाणून घेण्याजोगी आहे.
‘ओ साहेब... भ्या कुणाला दावताय, आमचं पायतान माप घट हाय’ हा वाक्प्रचार कोल्हापुरातील गल्ली-बोळांमध्ये, महापालिका सभागृहात आणि विविध बैठकांमध्ये अगदी हमखास ऐकायला मिळतो. पायताण घट याचा अर्थ - परिस्थिती कशीही असू दे आम्ही त्याला तोंड द्यायला सक्षम आहोत, कारण आमची बाजू खरी आहे - असा होतो. आता या वाक्प्रचाराचा आणि पायताणाचा काय संबंध, असा प्रश्न नक्कीच पडू शकतो, पण अस्सलतेचं प्रतीक म्हणजे ‘कोल्हापुरी पायताण’ ही संकल्पना आहे या वाक्प्रचारामागे. म्हणूनच हे पायताण इथल्या जगण्याशी एकरूप झालंय!
कोल्हापुरी चप्पल याच नावानं ओळखलं जाणारं हे पायताण पहिल्यांदा कोणी तयार केलं होतं, तो काळ कुठला होता, पहिला कारागीर कोण होता, या आणि अशा प्रश्नांची ठोस उत्तरं कोणालाही माहिती नाहीत. कारण अत्यंत कलात्मक चप्पल घडवणाऱ्या या कारागिरांना पूर्वी लिहिता-वाचताही येत नव्हतं. त्यामुळे इतिहासाच्या पटलावर त्याबाबतच्या फारशा नोंदी सापडत नाहीत. पण बाराव्या शतकापासून किंवा त्याही आधीपासून कोल्हापुरी चप्पल अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं.
खरंतर कोणतीही चप्पल म्हणजे एक वस्तूच, पण इथल्या कारागिरांनी आपल्या प्रतिभेनं आणि कल्पकतेनं या चपलेला अजरामर केलं. ब्रिटिशांच्या काळात युरोपीय लोकांनाही तिची भुरळ पडली होती. आजही अमेरिका, जपान, अरब राष्ट्रं, अफ्रिकी देशांत कोल्हापुरी चपलेची निर्यात होते. पूर्वी अनेक राजा-महाराजांपासून शेतकरी, धनगरांपर्यंत सगळ्या सामाजिक, आर्थिक स्तरातली लोकं मोठ्या कौतुकानं कोल्हापुरी चप्पल पायात चढवत असत. आजही ही परिस्थिती फारशी बदललेली नाही.