

Sahyadri forts reveal glorious Swarajya legacy through responsible trekking
esakal
ओंकार ओक
कधी राजगडाच्या सदरेवर बसून महाराजांनी केलेल्या न्यायनिवाड्यांच्या गाथा मनात साठवून घेतल्या आहेत? कधी प्रतापगडाच्या ध्वज बुरुजावर उभं राहून खाली दिसणाऱ्या जनीच्या टेंभावर अवतरलेलं उग्रनरसिंहरूप आणि त्याच्या तीक्ष्ण नख्यांनी पोट फाडल्यावर अफझलखानाच्या तोंडून निघालेल्या प्रलयंकारी किंकाळ्या ऐकू आल्या आहेत? कधी हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर उभं राहून शांतपणे तिथून दिसणारी संध्याकाळ फोन हातात न घेता डोळ्यात कायमस्वरूपी भरून घेतली आहे? कधी रायरेश्वराच्या पठारावरून किंवा आडवाटेच्या एखाद्या किल्ल्यावरून चांदण्या रात्रीचं गच्च भरलेलं आभाळ डोळ्यात साठवलं आहे? याचं उत्तर ‘नाही’ असेल, तर मग आपण ट्रेकला जाऊन नक्की काय करतो, याचं उत्तर प्रत्येकानं नक्की शोधावं.
ता. २३ मे १६७३. घामाने ओथंबून निघालेले आणि सह्याद्रीच्या अक्राळविक्राळ, भेदक आणि बलाढ्य रूपाची अजिबातच सवय नसलेले तीन-चार लोक घाम टिपत, धापा टाकत एक दुर्गम दुर्ग चढत होते. त्या दुर्गाचं एकेक अंग-प्रत्यंग अत्यंत आश्चर्यमिश्रित कुतूहलानं न्याहाळत वर वर जाताना खालच्या पाताळस्पर्शी दरीकडे बघून त्यांची दृष्टी फिरली नसती तरच नवल. महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण जगताच्या एकमेवाद्वितीय अशा साक्षेपी दुर्गनिर्मात्यानं निर्मिलेली ती अभेद्य शिवलंका, अर्थात शिवछत्रपतींच्या गरुडनजरेतून साकारलेला ‘किल्ले रायगड’ बघून त्यातल्या एकानं आपल्या रोजनिशीत काळाच्या पटलावर अजरामर झालेली एक नोंद करून ठेवली - ‘हा किल्ला इतका अभेद्य आहे, की जर अन्नधान्याचा पुरेसा साठा इथे असेल तर अपुऱ्या शिबंदीनीशी (मोजकं सैन्य असतानाही) हा किल्ला संपूर्ण जगाविरुद्ध लढू शकेल!’... मित्रांनो, ही नोंद आहे ‘थॉमस निकल्स’ नावाच्या चक्क एका इंग्रज अधिकाऱ्याची (संदर्भ : इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी, पान क्र. २५२) आजही रायगड या नोंदीतल्या शब्दाशब्दाची जाणीव प्रत्येक पावलागणिक आपल्याला करून देतो आणि इथंच रामचंद्रपंत अमात्यरचित आज्ञापत्र या ग्रंथातील सुवर्णाक्षरानं कोरून ठेवण्यासारख्या एका ओळीची यथार्थता सिद्ध होते, आणि ती म्हणजे ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’!