

Warkari tradition legacy
esakal
डॉ. जयवंत प्रभाकरदादा बोधले महाराज
सोलापूर जिल्ह्यातील धामणगाव येथे १६०४मध्ये जन्मलेले संत माणकोजी महाराज बोधले हे तुकोबारायांचे समकालीन विठ्ठलभक्त संत होते. त्यांच्या अखंड भक्तीमुळे धामणगावला ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळख प्राप्त झाली. दानशूर वृत्ती, कीर्तनपरंपरा, व्यापक शिष्यसंप्रदाय, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश आणि संजीवन समाधीमुळे त्यांचे कार्य महाराष्ट्रासह कर्नाटक-आंध्र प्रदेशातही गौरवले जाते. त्यांच्या १२५ अभंगांची गाथा आणि बोधलीलांबरी हा चरित्रग्रंथ उपलब्ध आहे.
संतांनी आपल्या आचार-विचारांतून महाराष्ट्राची माती सुपीक केल्याने भारतवर्षामध्ये महाराष्ट्राच्या तोडीचे बलाढ्य पारमार्थिक क्षेत्र दुसरे कोणतेही दिसून येत नाही. गंगाखेडच्या संत जनाबाई, अरणचे संत सावता, बांधवगडचे संत सेना महाराज, देहूचे संत तुकाराम महाराज आदी संतांनी वैचारिक उन्नती व आचरणाला प्राधान्य देऊन भक्तिपंथे समाजाचा दर्जा उंचावण्यासाठी संपूर्ण जीवन वाहिले. श्रीसंत माणकोजी महाराज बोधले हे श्रीजगद्गुरू तुकोबारायांचे समकालीन संत होते.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बालाघाटाच्या पायथ्याला नागझरी नदी तीरावर वसलेले गाव म्हणजे धामणगाव. धर्मेश्वराच्या प्राचीन मंदिरावरून या गावास धर्माण्यपूर असे नाव पडले. त्याचा अपभ्रंश होऊन धामणगाव झाले. याच धामणगावात १६०४मध्ये श्रीसंत माणकोजी महाराजांचा जन्म झाला. थोर विठ्ठलभक्त संत माणकोजी महाराज बोधले यांनी धामणगावला धाकट्या पंढरीचे पावित्र्य प्राप्त करून दिले. क्षत्रिय कुळात, अत्यंत संपन्न घराण्यात, पिता भानजी जगताप व आई पार्वती यांच्या पोटी संत माणकोजी महाराजांचा जन्म झाला. भानजी-पार्वती या दांपत्याला वारकरी संप्रदायाची ओढ होती. या दांपत्याला शिवाजी महाराज व माणकोजी महाराज अशी दोन मुले.