

Vitamin B12 and D3 deficiency
esakal
डॉ. सुबोध देशमुख
आपले शरीर सूर्यप्रकाशाच्या मदतीने त्वचेमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी-३ तयार करत असते. आजकाल लोक तासन्तास एसी ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये बंदिस्त राहिल्यामुळे सूर्यप्रकाशाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचण्यात अडथळे येतात. निसर्गाशी आणि सूर्यप्रकाशाशी जोडले जाणे हा या समस्येवरील सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे.
आजच्या आधुनिक आणि बैठ्या जीवनशैलीत जीवनसत्त्वांची कमतरता असणे, ही एक अत्यंत गंभीर समस्या झाली आहे. विशेषतः व्हिटॅमिन बी-१२ आणि व्हिटॅमिन डी-३ या दोन घटकांची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी, नसांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी ही दोन्ही जीवनसत्त्वे आवश्यक असतात. सुरुवातीला या कमतरतेकडे किरकोळ थकवा म्हणून दुर्लक्ष केले जाते, पण दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात. योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करून आपण या दोन्ही घटकांची पातळी सहज सुधारू शकतो.
व्हिटॅमिन बी-१२ हे पाण्या त विरघळणारे जीवनसत्त्व असून ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि डीएनए तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. मेंदूचे कार्य आणि मज्जासंस्था म्हणजेच नसांचे आरोग्य पूर्णपणे या जीवनसत्त्वावर अवलंबून असते. दुसरीकडे व्हिटॅमिन डी-३ हे चरबीत विरघळणारे जीवनसत्त्व असून ते शरीरात कॅल्शियम शोषून घेण्याचे मुख्य काम करते. हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी डी-३ची भूमिका महत्त्वाची असते. या दोन्हीपैकी एकाही घटकाची कमतरता झाल्यास शरीराची अंतर्गत कार्यप्रणाली विस्कळीत होते. आपल्या एकूण आरोग्याचा पाया या दोन महत्त्वाच्या जीवनसत्त्वांवर आधारलेला आहे.