

Premium|Javali Conquest 1656
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४६ पासूनच्या धोरणात्मक मुत्सद्देगिरीतून १६५६ मध्ये जावळी जिंकून मोऱ्यांचा बिमोड केला; यातूनच घाटवाटांचे नियंत्रण, प्रतापगडाची निर्मिती आणि स्वराज्याचा कोकण प्रवेश साध्य झाला. ज्यामुळे पुढे सिद्दी व आदिलशाही या प्रबळ सत्तांशी संघर्षाचा एक नवा आणि तेजस्वी ऐतिहासिक अध्याय सुरू झाला.
जावळीची पार्श्वभूमी ः ‘जावळी’ (जयवल्ली) संस्थानची स्थापना करणाऱ्या पुरुषाचे मूळ नाव चंद्रराव असे होते. या चंद्रराव मोऱ्यांना ६ मुले होती. त्यातल्या थोरल्याला त्याने स्वतःजवळ ठेवले व त्यालाच पुढे ‘चंद्रराव’ हा किताब मिळाला. इतर ५ जणांना जोर येथे ‘हणमंतराव’, जांभळी येथे ‘गोविंदराव’, कोंढवी परगण्यातील वाकण येथे ‘बागराव’ (भिकाजीराव), आटेगाव प्रांतातील देवळी येथे ‘सूर्यराव’, बिरवाडी प्रांतातील शिवथर येथे ‘यशवंतराव’ अशी स्थाने मिळाली. त्या शाखेच्या मूळ पुरुषांची नावेच पुढे त्यांचे किताब म्हणून रूढ झाली. थोरल्या शाखेत मूळ चंद्ररावापासून पुढे ८ पिढ्या झाल्या. चंद्रराव (संस्थापक)-चयाजी-भिकाजी-शोदाजी-येसाजी-गोंदाजी-बाळाजी-व दौलतराव. (ग. भा. मेहेंदळे, पृ.६५५).
जावळीचा भूगोल ः कोकण व घाटमाथा या दोन्ही प्रदेशांना जोडणारा जावळीचा प्रांत सुमारे १५०० चौ. कि.मी. पसरलेला होता. यामध्ये मंगळगड (५ तर्फा व २०७ गावे), जावळी (७ तर्फा व १९५ गावे), व्याघ्रगड (५ तर्फा व १५१ गावे) व महिपतगड (१ तर्फ व १८ गावे) असे प्रमुख विभाग व सुमारे ५७१ छोटी-मोठी गावे मोडत होती (शाहू दप्तर). महाबळेश्वरचे पठार; कृष्णा (जोर खोरे), वेण्णा, कांदाटी, कोयना, सावित्री, सोळशी व वाळकी (जांभूळ खोरे) या नद्यांच्या उगमस्थळांचे डोंगरमाथे व खोरी; पाचगणी; सोळशी नदीच्या पश्चिम तीराजवळून तापोळे; कांदाटी व जगबुडी नद्यांचे उत्तर तीराजवळून पोलादपूर; सावित्री नदीच्या पूर्व तीराजवळून महाड; काळ नदीच्या उगमस्थळाजवळील रायरी (रायगड) व पाचाड; काळ नदीच्या तीराजवळून वरंध येथपर्यंत जावळीच्या सीमा होत्या. शिवकाळात जावळीवर मोरेंची तर जावळीस लागून असलेल्या प्रभावळीवर शृंगारपूर येथे सुर्व्यांची सत्ता होती व शिर्के त्यांचे प्रधान होते. काळ व सावित्री नदीच्या खोऱ्यातील रायरी व महाड या भागांसाठी सिद्दी व मोऱ्यांमध्ये संघर्ष होत असे. तसेच जोर खोरे, बीरवाडी प्रांत इत्यादींवरून आदिलशाहा व मोऱ्यांमध्ये वाद होते.