

Afzal Khan Pratapgad Visit
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
अफजलखान शिवरायांना मारण्याच्या हेतूने मोठ्या फौजेनिशी विजापूरहून निघाला. तो वाईला आल्यावर, शिवरायांनी मुत्सद्देगिरीने त्याला जावळीत प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास राजी केले. खानाने सर्व बाजूंनी वेढा दिला, तरीही शिवरायांनी संयम बाळगला. खानाची क्रूरता आणि शिवरायांची युद्धनीती यातून प्रतापगडावरील आगामी थरारक भेटीची पार्श्वभूमी स्पष्ट होते.
आदिलशाहाचा हेतू ः मोहिमेवर निघतेसमयी अली आदिलशाहाने अफजलखानास पुढील आदेश दिला, ‘त्यास (शिवाजीराजांस) मुळापासून उखडून काढून, त्याच्या आयुष्याची शिल्लक रक्कम विनाशाच्या मुशीत वितळवावी व त्याच्या आयुष्याचे शेत घोड्यांच्या टापांखाली तुडवावे... त्याच्या आयुष्याच्या पिकावर मृत्यूचा अग्नी फेकण्याशिवाय आणि त्याच्या जीविताची गढी पाडण्याशिवाय दुसरे काहीही करू नये...’ (तारीख-इ अली). याचा अर्थ, ‘जिंदा या मुर्दा’ नव्हे तर शिवरायांना मारण्याचा स्पष्ट हुकूम खानाला होता. अफजलखानाच्या या मोहिमेचे शिवचरित्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, याचे कारण त्याचे व्यक्तिमत्त्व.