

Dairy Business Growth India
esakal
प्रसाद घारे - prasad.ghare@gmail.com
सुमारे सहा दशकांपूर्वी एका म्हशीपासून सुरू झालेला दुग्ध व्यवसाय आज हजारो पुणेकरांच्या विश्वासाचा ब्रॅंड बनला आहे. सचोटी, गुणवत्तेचा आग्रह आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामुळे पायगुडे कुटुंबियांची ‘श्रीराम डेअरी’ पुण्यातील दुग्ध व्यवसायात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. भारताच्या धवलक्रांतीत छोट्या डेअऱ्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘श्रीराम डेअरी.’ एका छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे, त्याची ही प्रेरणादायी यशोगाथा...
भारताची वाटचाल आर्थिक महासत्तेकडे सुरू आहे की नाही, याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद असू शकतात; मात्र १९९८ पासून म्हणजे गेली तब्बल २८ वर्षे दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे, याबाबत कोणाचेही दुमत नाही. आज जगाच्या पाठीवर भारत हा दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असून, जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा जवळपास २२ ते २५ टक्के इतका आहे. भारतानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझील या देशांचा क्रमांक लागतो. ही आकडेवारी सांगण्याचे कारण म्हणजे आपण पुण्यातील अशा एका डेअरीची यशोगाथा जाणून घेणार आहोत, जिने खऱ्या अर्थाने शून्यातून आपला व्यवसाय उभा केला. पुण्यातील प्रसिद्ध पैलवान काशिनाथ पायगुडे यांनी १९६७-६८ च्या सुमारास या व्यवसायास लहान प्रमाणात सुरुवात केली. आज ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेले त्यांचे पुत्र विनायक पायगुडे (भाऊ) यांनी अथक परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर या व्यवसायाला आकार दिला. गेल्या १५-२० वर्षांत विनायक पायगुडे यांचे पुत्र श्रीधर आणि श्रीराम यांनी या डेअरीचा मोठ्या प्रमाणात विस्तार करून तिला नावलौकिक मिळवून दिला. आगामी काळात पायगुडे कुटुंबीयांची चौथी पिढी या व्यवसायात पदार्पण करणार आहे. जवळपास साठ वर्षे चोखंदळ पुणेकरांचा विश्वास संपादन केलेल्या या डेअरीचे नाव आहे ‘श्रीराम डेअरी.’