

IPL 2026 Team Performance
esakal
टाटा आयपीएल स्पर्धा आता चांगलीच रंगात आली आहे. काही संघ मस्त खेळ करून सामने जिंकत आहेत, तर काही संघ पराभवाच्या गटांगळ्या खाताना दिसत आहेत. काही संघांना दुखापतींनी ग्रासले आहे तर काही नामांकित संघांनी योजना आखताना केलेल्या चुकांची शिक्षा त्यांना भोगायला लागते आहे. स्पर्धेतील अजून भरपूर सामने बाकी आहेत, तेव्हा अंदाज वर्तविण्यात अर्थ नाहीये. फक्त कोणत्या चुका सर्वांत मर्मी घाव करत आहेत, ते लक्षात घेऊयात.
मागच्या एका लेखात मी यंदाची आयपीएल गोलंदाज गाजवणार हा मुद्दा मांडला होता. त्याला कारण हेच होते की टी-२० क्रिकेट प्रकारात सर्व प्रकाशझोत फलंदाजांवर असला, तरी अखेर गोलंदाज भवितव्य ठरवत असतात. कधी कमी धावांचे षटक टाकून धावगतीला वेसण घालतात तर कधी जम बसलेला फलंदाज बाद करून नाट्यमय कलाटणी देतात. परिणामी ज्या संघांनी संघ बांधणी करताना गोलंदाजांचा विचार जास्त केला, ते संघ प्रगतीच्या मार्गावर दिसत आहेत. उलटपक्षी जास्त करून तगड्या फलंदाजांचा विचार करून संघ बांधणी केलेल्या सनरायझर्स हैदराबादसारखा संघ तुफानी फलंदाजी असून अपेक्षित उंची गाठत नाहीये. या उलट मोठ्या नावाच्या खेळाडूंचा भरणा केलेल्या मुंबई इंडियन्स संघाला गोलंदाजीत लय सापडली नसल्याने सलग पराभवांचा सामना करावा लागतो आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाला तर चहूबाजूंनी घेरले गेल्यासारखे वाटत असणार, इतका त्यांचा खेळ खराब होतो आहे. प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि खेळत असलेल्या खेळाडूंचा खराब फॉर्म सगळेच कोलकाता संघासाठी डोकेदुखी ठरते आहे.