

Artemis 2 lunar mission
esakal
अमेरिकेच्या नव्या चांद्रमोहिमेला सुरुवात झाली आहे. पन्नास वर्षांपूर्वी अंतराळ मोहिमेद्वारे चंद्रावर मानवाने पहिल्यांदा पाऊल ठेवले होते. नासाच्या आत्ताच्या आर्टेमिस दोन या मोहिमेत चार लोक सहभागी झालेले आहेत. कुणीही चंद्रावर उतरणार नाही, पण तिथल्या वातावरणाचा नेमका अभ्यास करून ही मंडळी परत येणार आहेत. पन्नास वर्षांनी होणाऱ्या या चांद्रमोहिमेत केवळ काळाचा फरक पडला आहे असे नाही, तर उद्दिष्टेदेखील बदलली आहेत. ही उद्दिष्टे इतक्या व्यापक स्वरूपात बदलली आहेत, की पन्नास वर्षांपूर्वी चंद्रावर उतरणे हे औत्सुक्याचे, कुतूहलाचे नवीन काहीतरी शोधल्याच्या आनंदाचे कारण होते. मात्र आत्ताची मोहीम अधिकाराची आणि चंद्रावरून आपल्याला काय मिळू शकेल, याच्या शोधाची आहे. अमेरिका आणि या गटातील काही देश यांची ही मोहीम आहे, तशीच रशियाच्या पुढाकारानेदेखील आणखी एक मोहीम लवकरच सुरू होईल. एकूणच आता पृथ्वीवर जशी विविध देशांमध्ये आपल्या हद्दीची, अधिकाराची आणि काही गोष्टी मिळवण्याची स्पर्धा आहे, तशी स्पर्धा चंद्र या उपग्रहावरून आपल्याला काय मिळवता येईल, याचीच शोधमोहीम यापुढच्या काळात असेल.
त्यासाठीच मोठे उद्योजक सरकारच्या बरोबरीने या मोहिमेत उतरलेले आहेत. उद्योजक जेव्हा अशा स्वरूपाच्या महाखर्चीक मोहिमांमध्ये उतरतात, तेव्हा त्यामागे केवळ जनहित नसते, तर आपल्याला यातून काही प्रमाणात का होईना फायदा कसा मिळेल, याचा विचार त्यामागे असतो. आत्ताही तसा हेतू या मोहिमेत आहेच आहे, मात्र या नफ्याच्या हेतूला गळेकापू स्पर्धेचे रूप येऊ नये, अशीच अपेक्षा मानवतेसाठी काम करणाऱ्या सगळ्या घटकांची आहे. चांद्रमोहिमेच्या या फेरीची पायाभरणी पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या मोहिमेतच केली गेली होती. मार्गारेट हॅमिल्टन या महिलेने लिहून ठेवलेल्या प्रोग्रॅमिंगमुळे आजच्या मोहिमेचा मार्ग सुकर झाला, हे सगळ्यांची लक्षात ठेवले पाहिजे. पहिली मोहीमसुद्धा त्यावेळी तिने लिहून ठेवलेल्या संगणकीय प्रोग्रॅममुळे वाचली होती. त्या वेळच्या मोहिमेत शेवटच्या क्षणी संगणकीय प्रणालीत अडचण निर्माण झाली होती, पण संगणकाने सर्वांत आधी काय करावे, अशा स्वरूपाचा प्रोग्रॅम मार्गारेटने आधीच लिहून ठेवलेला असल्याने नासातील त्यावेळच्या प्रणालीने आपले ध्येय पूर्ण केले. सॉफ्टवेअरच्या क्षेत्राची जनक मानली जाणारी मार्गारेट तेव्हा या मोहिमेच्या यशाच्या झगमगाटात दुर्लक्षितच राहिली. आज मात्र सारे संशोधनविश्व तिची आठवण काढत आहे. मोहिमांचे श्रेय तिला देत आहेत, हे महत्त्वाचे.