

Bihar Election NDA Victory
esakal
लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या अनपेक्षित मुसंडीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीसे सावध दिसत होते. लोकसभेनंतरच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला यश मिळत राहिले आणि आता बिहारमध्ये ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयामुळे मोदी पुन्हा पूर्वीच्या रूपात आले असून, त्यांचा हा आक्रमक अवतार विरोधी पक्षांसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी मुसंडी मारली होती आणि त्यांच्या बाजूने एक वातावरण तयार झाले होते. मात्र, बिहार निवडणुकीच्या निकालांनी विरोधी पक्षांची गाडी पुरती उधळून लावली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. आता बिहारच्या निवडणुकीतील अपयशानंतर विरोधी पक्षांची स्वप्ने चक्काचूर झाली आहेत. लोकसभा निवडणुकीतील काठावरील यशानंतर, हरियानामध्ये भाजपने विजय मिळविला. त्यामुळे, भाजपच्या नीतीधैर्याला आधार मिळाला होता. त्याच पद्धतीने या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विरोधी पक्षांना लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. बिहारचा निकाल अनेक अर्थांनी अद्भुत असा आहे. या निवडणुकीमध्ये एखाद्याने अंदाजपंचे व्यक्त केलेले दावे सोडले, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) २००पेक्षा जास्त जागा मिळतील किंवा महाआघाडी ५०पेक्षा कमी जागांपुरतीच उरेल, असा अंदाज कोणीही व्यक्त केला नव्हता. या यशानंतर भाजपला आभाळ ठेंगणे झाले आहे, तर महाआघाडीला जबर धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच काळ लागणार आहे.