

Raj Bhavan vs Nabanna Conflict
esakal
सुरेंद्र पाटसकर - sarkarnama@esakal.com
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यातील संघर्ष नवीन नाही. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील संघर्षाने भाजपबरोबरील संघर्षाला अधिक धार आली आहे. आपले हेतू साध्य करण्यासाठी केंद्र सरकार राज्यपालांचा वापर करत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी वारंवार केला आहे. इतर मुद्द्यांबरोबरच हा संघर्षाचा मुद्दा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गाजणार हे नक्की.
भारतीय संघराज्य व्यवस्थेची रचना अशी आहे की राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोन पदांमध्ये समन्वय असणे अपेक्षित असते. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतात, तर मुख्यमंत्री हे लोकनियुक्त सरकारचे नेतृत्व करतात. या दोन पदांमध्ये संतुलन राखले गेले तर प्रशासन सुरळीत चालते; परंतु या नात्यात जेव्हा राजकारण घुसते, तेव्हा संघर्ष अपरिहार्य ठरतो. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडी ही या वास्तवाची जिवंत उदाहरणे आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष आता अपवाद राहिलेला नाही; तो जणू राज्याच्या राजकारणाचा कायमस्वरूपी भाग बनला आहे.