

Inflation index change India 2026
esakal
प्रियांका कुलकर्णी - priyankakulkarni2201@gmail.com
आ पल्या देशात जानेवारी २०२६ पासून महागाई मोजण्याच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. विशेषतः आधार वर्ष (Base Year) आणि वस्तू-सेवांना दिले जाणारे वजन (Weightage) यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या बदलांमुळे महागाईचे चित्र अधिक वास्तववादी आणि सध्याच्या आर्थिक परिस्थितीशी सुसंगत दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर महागाई म्हणजे काय, ती कशी मोजली जाते आणि हे बदल का आवश्यक होते, हे समजून घेऊ या.
हागाई म्हणजे कालांतराने वस्तू आणि सेवांच्या किमतींमध्ये होणारी वाढ. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आज ज्या वस्तू १०० रुपयांत मिळतात, त्या काही काळानंतर ११० किंवा १२० रुपयांना मिळू लागल्या, तर त्या वाढीला महागाई म्हणतात. महागाई वाढल्यास पैशाची खरेदीक्षमता कमी होते. म्हणजेच, पूर्वी जितक्या पैशांत अधिक वस्तू मिळत होत्या, आता त्याच पैशांत कमी वस्तू मिळतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर थेट परिणाम होतो.
भारतात महागाई प्रामुख्याने ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) या पद्धतीने मोजली जाते. या पद्धतीत सर्वसामान्य नागरिक रोज वापरत असलेल्या वस्तू आणि सेवांची एक यादी तयार केली जाते. या यादीला ‘बास्केट’ (Basket) असे म्हणतात. यात अन्नधान्य, भाजीपाला, इंधन, घरभाडे, शिक्षण, आरोग्य अशा विविध घटकांचा समावेश असतो.
एक आधार वर्ष निश्चित केले जाते आणि त्या वर्षातील निर्देशांक १०० मानला जातो. पुढील वर्षांतील किमतींची तुलना या आधार वर्षाशी केली जाते. या तुलनेवर आधारित निर्देशांक तयार होतो आणि त्यावरून महागाई दर काढला जातो.
उदा. आधार वर्षात निर्देशांक १०० असेल आणि सध्याच्या वर्षात तो १६० झाला, तर किमती सुमारे ६० टक्क्यांनी वाढल्या, असे मानले जाते.