

Anti Naxal Operations in India
esakal
एमएनएस कुमार - sarkarnama@esakal.com
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६पूर्वी देशातून नक्षलवाद संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार, अनेक मोठे नक्षलवादी म्होरके चकमकीत ठार झाले आहे. तर काही महिन्यांमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे १२ राज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या नक्षलवादी चळवळीला घरघर लागली आहे.
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६पर्यंत देशातील नक्षलवाद पूर्ण संपवून टाकण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी सुरक्षा दलांकडून पावले टाकण्यात येत आहेतच; त्याचबरोबर काही दिवसांमध्ये नक्षलवादीही मोठ्या संख्येने शरण येत असल्याचे दिसून येत आहे. छत्तीसगड, तेलंगण, आंध्र प्रदेश, ओडिशा यांसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये नक्षलवाद पसरलेला होता. या राज्यांमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त काळ नक्षलवादाचे अस्तित्व आहे. मात्र, नक्षलवादाच्या भवितव्याविषयी आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तेलंगणमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासमोर १३६ नक्षलवाद्यांनी सामूहिक आत्मसमर्पण केले. तसेच, छत्तीसगडमध्ये ‘लोन वर्राटू’ या मोहिमेलाही यश मिळत आहे. त्यामुळे नक्षलवादी आपला जीव वाचविण्यासाठी मुख्य प्रवाहात येत आहेत का? त्यांच्यावर सुरक्षा दलांचा दबाव आहे की जनतेमध्ये त्यांच्या हिंसक विचारसरणीविषयीचे आकर्षण कमी होत आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधताना पाच-सहा दशकांपासून सुरू असणारे नक्षलवादी आंदोलन आता एका मोठ्या वळणावर येऊन ठेपले आहे, हे निश्चितपण दिसून येते.
नक्षलवादी चळवळीचा जन्म समाजातील दलित, शोषित, आदिवासी आणि गरिबांच्या हक्कांच्या रक्षणासाठी झाला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे प्रस्थापित आणि शोषकांविरोधात अनेक दशके संघर्ष करणाऱ्या या चळवळीला आज आपले अस्तित्व आणि कालसुसंगतता जपण्यासाठीच संघर्ष करावा लागत आहे. एकेकाळी देशातील १२ राज्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव होता, मात्र आज काही पोलिस स्थानकांच्या क्षेत्रापुरते त्यांचे अस्तित्व मर्यादित राहिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देवजी, मल्लोजुला वेणुगोपाल चारी यांसारखे अनेक मोठे म्होरके शरण आल्यामुळे या संघटनेचे कंबरडे मोडले आहे.