पुणे : पुणे- मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची झालेली गैरसोय दूर करण्यासाठी एसटीच्या पुणे विभागाने तब्बल ७० जादा बस पुणे स्टेशन स्थानकारून मुंबई मार्गावर गुरुवारी सोडल्या. तसेच एसटीची कोकणातील मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुणे- मुंबई मार्गावरील ११ रेल्वेगाड्या गुरुवारी सकाळपासून टप्प्याटप्प्याने रद्द होत गेल्या. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. हे प्रवासी पुणे स्टेशन स्थानकावर पोचले. तेथे त्यांची गर्दी झाली होती. गाड्या रद्द झाल्याची माहिती मिळताच एसटीच्या पुणे विभागाने शिवनेरी, शिवशाही आणि साध्या बसची व्यवस्था केली. सुमारे ७० जादा बस दिवसभरात मुंबईकडे रवाना झाल्या. मुंबईकडे जाताना मुसळधार पाऊस असला तरी, गाड्या मुंबईला सुरक्षितपणे पोचत असल्याची माहिती पुणे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली.
मुसळधार पावसामुळे महाड गुरुवारी बंद करण्यात आले. त्यामुळे तेथून पुढे एसटी बस जाऊ शकल्या नाहीत. वरंधाघाटातूनही वाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे कोकणातील मार्गांवर ताम्हिनी घाटातून बस सोडण्यात आल्या. परंतु, त्या माणगावच्या पुढे जाऊ शकल्या नाहीत. परिणामी रत्नागिरी, चिपळून, सिंधुदुर्ग, दापोली, खेड, मलाकापूर, राधानगरी आदी ठिकाणी एसटी बसची वाहतूक होऊ शकली नाही. कोल्हापूर, सातारा, सांगली मार्गावर पाऊस असला तरी, तेथील वाहतूक सुरळीत होती, असेही त्यांनी सांगितले. पावसाचा जोर कमी झाल्यावर कोकणातील मार्गांवरील वाहतूक सुरू होईल, असेही रणवरे यांनी स्पष्ट केले. पावसामुळे कोकणातील विविध शहरांत मुक्कामाला गेलेल्या बस गुरुवारी पुण्यात येऊ शकल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.