RTE : २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला; वाचा सविस्तर!

RTE
RTE

पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित असलेल्या आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी आणि संकलन यंदा शाळा स्तरावर करण्यात येणार असून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर का होईना ही रखडलेली प्रवेश प्रकिया पुन्हा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाला अखेर मुहूर्त मिळाला.

सद्याची परिस्थिती पाहता शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी ही समितीकडे जाऊन करणे अशक्य आहे. म्हणूनच फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर पडताळणी होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी असणाऱ्या अधिकृत पोर्टलवर शाळांच्या लॉगिनला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक दिलेला आहे. त्यानुसार संबंधित क्रमांकवर प्रवेशाबाबत तारीख वेळ कळवावी. आणि पालकांची गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने प्रवेशाचे नियोजन करावे, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी शाळांना दिले आहेत.

या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या लॉटरीद्वारे राज्यातील सुमारे एक लाख ९२९ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे.  त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे प्रवेश प्रकियेचे पुढील काम अपूर्ण राहिले. आता ही प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याप्रमाणे प्रवेशाचे नियोजन करण्यात येत आहे. आरटीई प्रवेशाच्या अधिकृत पोर्टलवर येत्या बुधवारनंतर (ता. २४) विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अर्जाचा नंबर टाकल्यास  शाळेने प्रवेशासाठी किती तारखेला बोलाविले आहे, ही माहिती मिळू शकणार आहे, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

शाळांनी करावयाची कार्यवाही :
- प्रवेशासाठी गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने पालकांचा बोलविण्यासाठी नियोजन करावे
- प्रवेशाचे वेळापत्रक प्रवेशद्वारावर किंवा योग्य ठिकाणी लावावे
- कागदपत्रांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर पालकांना अॅलॉटमेट लेटर द्यावे आणि तात्पुरता प्रवेशाची नोंद करावी आणि पालकांकडून हमीपत्र घ्यावे.
- पालकांना प्रवेशासाठी तिनदा संधी द्यावी.
- तात्पुरता प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रमात सहभागी करून घ्यावे.
- शाळांनी पालकांकडून संकलित केलेल्या कागदपत्रे पडताळणी समितीकडे घेऊन जावे आणि प्रवेश निश्चित करावा.
- प्रतीक्षा यादीतील पालकांबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येणार आहेत.
- कोरोनबधित क्षेत्रात किंवा त्यासाठी शाळा ताब्यात घेतली असल्यास अटी शिथिल झाल्यानंतर कार्यवाही व्हावी.

पालकांसाठी सूचना :
- शाळांनी प्रवेशाबाबत एसएमएस पाठविल्यावर दिलेल्या कालावधीत मुळ कागदपत्रे आणि छायांकित प्रत घेऊन शाळेत जावे
- दिलेल्या कालावधीत जाणे अशक्य असल्यास, शाळेला कळवावे आणि पुढील तारीख घ्यावी
- केवळ शाळांच्या मेसेजवर अवलंबून न राहता पालकांनी प्रवेशाच्या पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या कालावधीची खात्री करावी.
-  पोर्टलवरील पालकांसाठी असणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
- प्रवेशाबाबत शाळांचा मेसेज किंवा पोर्टलवर कालावधी आल्याशिवाय पालकांनी प्रवेशासाठी शाळेत किंवा पडताळणी समितीकडे गर्दी करू नये.
- कागदपत्रे चुकीची किंवा अर्जातील माहिती चुकीची आढळल्यास हमीपत्रातील अटीप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com