पुणे : शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील वसतिगृह, ग्रंथालय, खेळाचे मैदान यांसह अनेक सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याकडे महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने 600 विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले.
कृषी महाविद्यालयातील वसतिगृहाची दुरवस्था झाली असून, वीज, पाणी यांसह अनेक मूलभूत गोष्टी व्यवस्थित पुरविल्या जात नाहीत. ग्रंथालय बंद केले जात असल्याने आवश्यक असलेली पुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध होत नाहीत. सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी येऊन सुद्धा हा निधी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वापरला जात नाही.
महाविद्यालयाच्या मैदानावर खासगी कार्यक्रमांना परवानगी दिली जात असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा खेळण्यासाठी वापर करता येत नाही. यासह इतर समस्या दूर करण्याची मागणी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एस. रसाळ यांना यांच्याकडे विद्यार्थांनी अनेक वेळा केली. पण आश्वासनांशिवाय विद्यार्थ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यामुळे अखेर मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून महाविद्यालयाच्या मुख्य इमारती समोरील जागेत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. मागण्यांचे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, प्राचार्य रसाळ यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
- विद्यार्थ्यांना त्रास देणारे प्रशासन बदलावे
- शैक्षणिक सहलीचे 1250 रुपये जमा करावेत
- ग्रंथालय 24 तास उघडे असावे
- स्टायफंड लवकरात लवकर जमा करावा
- विद्यार्थी वसतिगृहाचे मुख्य प्रवेशद्वार कायम खुले ठेवावे
- विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी न. ता. वाडी रस्ता खुला करावा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.