Coronavirus : पुणे जिल्हयातील बहुतांश कृषी सेवा केंद्रे बंदच 

Agricultural-Service-Center
Agricultural-Service-Center

पुणे  - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू केले असले तरी जीवनाश्यक वस्तू म्हणून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना निविष्ठा विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक ठिकाणची कृषी सेवा केंद्रे बंद असल्याचे चित्र आहे. 

लवकरच खरीप हंगाम सुरु होत असल्याने शेतकऱ्यांना पुर्वतयारीच्या अनुषंगाने बियाणे व खते उपलब्ध होणे गरजेचे आहे. बियाणे व खते जीवनाश्यक वस्तु अधिनियम १९५५ अंतर्गत समाविष्ठ असल्याने त्यांची दुकाने पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर काही कालमर्यादेसाठी सुरु ठेवणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील कृषी सेवा केंद्र सुरु ठेवण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. 

सध्या ग्रामीण भागात ‘कोरोना’मुळे भितीचे वातावरण तयार झाल्याने आणि ग्राहकांची काळजी लक्षात घेऊन अनेक कृषी सेवा केंद्र चालकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. परंतु, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी ही दुकाने सुरु ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदेश निर्गमित केले आहे. मात्र, असे असतानाही अनेक गावांमधील कृषी सेवा केंद्रे बंद असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी मजूर वर्ग नसल्याने विक्री कशी करायची असा प्रश्न केंद्र चालक उपस्थित करीत आहे. अनेक गावांमध्ये स्थानिक प्रशासन व नागरिकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दुकाने बंद ठेवली जात आहेत. मात्र, बागायती भागात ग्राहक व कामगार उपलब्ध असल्याने काही सेवा केंद्र चालकांनी दुकाने सुरू ठेवली असल्याचे दिसून येते. 

महाराष्ट्र फर्टिलायझर सिड्स
 पेस्टिसाईटस डिलर्स असोसिएशनचे पुणे जिल्हा सहसचिव महेश मोरे म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही सुरूवातीला पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी झालो होतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून कृषी सेवा केंद्रे सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यातच कृषी आयुक्तालयाकडून एक परिपत्रक काढले आहे. त्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हयातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही कृषी सेवा केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, काही ठिकाणी केंद्रातील कामगार गावी गेले असून  काही ठिकाणी स्थानिक प्रशासन व नागरिकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बंद ठेवत आहे. परंतु काही गावांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन दिवस तर, काही ठिकाणी तीन ते चार तास सेवा केंद्र नियमाचे पालन करून सुरु ठेवले जात आहेत. येथे शेतकऱ्यांनी गरजेनुसार निविष्ठा खरेदी कराव्यात. 

निविष्ठा विक्री करताना खालील सुचनाचे पालन करावे ः 
- विक्री केंद्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत चारपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्यात यावे. 
- विक्री केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांना तोंडाला मास्क किवा रूमाल बांधण्यासाठी प्रवृत्त करावे. 
- विक्री केंद्रात साबण, हॅण्डवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. 
- विक्री केंद्रात नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे. 
- खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची मोबाईल क्रमांकासह नोंद ठेवण्यात यावी. 
- स्थानिक प्रशासनाकडील नियमांचे काटेकोर पालन करावे. 
- निविष्ठांची जादा दराने विक्री करू नये, अन्यथा निविष्ठा कायद्याअंतर्गत कारवाई होईल याची नोंद घ्यावी. 
- विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती करू नये. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com