सौंचं भाग्य; आमुचं ‘सौ’भाग्य !

Panchnama
Panchnama

कालपासून आम्ही असे ठरवले आहे की बायकोशी अजिबात भांडायचे नाही. नाही म्हणजे नाही. हा संकल्प आठवडाभर तरी टिकावा, अशी आमची इच्छा आहे. पण या संकल्पाला सुरुंग लावायचे काम ‘विरोधी पक्षा’कडून सातत्याने सुरू आहे. आमच्या दिसण्यावरून, वेंधळेपणावरुन काल बरेच टोमणे मारून झाले. पण आम्ही संयम सोडला नाही. काल तिने लहानपणीचा भावंडांबरोबरील दोरीवर उड्या मारण्याचा फोटो फेसबुकवर टाकला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यालाही आम्ही लाईक करून, ‘व्वा छान’ अशी कमेंट दिली. खरे तर आम्ही ‘माकड उड्या’ असेच म्हणणार होतो; पण संकल्प आठवला. रात्री गॅस संपला आहे, असे सांगून तिने मुद्दाम पाणी गरम करून दिले नाही. त्यामुळे कडाक्‍याच्या थंडीतच थंड पाण्याने आम्ही भांडी घासली. पण आम्ही हूं की चूं केले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सहालाच तिने उठवले. ‘‘अहो, लवकर उठा, मला नाश्‍त्याला पोहे करायचेत.’’ आम्ही गाढ झोपेत होतो. ‘‘अगं मग कर की, मी काय कढईत झोपलोय का?’’ रागावर नियंत्रण मिळवत हसत हसत आम्ही म्हणालो.

‘एवढे कसे हो विसरभोळे तुम्ही ! रात्री गॅस संपलाय ना. आधी नवीन सिलिंडर लावून द्या.’’ मग काय सिलिंडर जोडून द्यावा लागला. अर्ध्या तासाने बायको तणतण करीत म्हणाली. ‘‘असा कसा सिलिंडर तुम्ही जोडून दिलाय. एक लिटर दूध तापवायला ठेवले होते. सगळे नासून गेलंय.’’ त्यावर ‘‘सॉरी. सॉरी. माझीच चूक आहे,’’ असे हात जोडून म्हटले. यावर तिचा चेहरा फुलला. संसारातील इतक्‍या वर्षांचा अनुभव कामी आला. मग आम्ही उगाचंच सिलेंडरची नळी काढून पुन्हा जोडली. थोड्या वेळानंतर शेजारच्या वहिनी कोथिंबीर नेण्यासाठी आल्या. त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे बघण्याचेही टाळले. ‘वहिनी, काल तुम्ही दिलेली पाव-भाजी काय मस्त झाली होती. तुमच्या हाताला फार चव आहे.’ हे वाक्‍य आमच्या ओठांवर आले होते. मात्र, पुढची रणधुमाळी टाळण्यासाठी आम्ही तोंडाला कुलूप लावले. मध्येच बायकोने दोन- तीन वेळा आमची खोडी काढण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही संयम बाळगला. उलट कधी नव्हे ते आम्ही तिच्या भावांची व भाच्यांचीही स्तुती केली. तिच्या वडिलांना फोन करून, तब्येतीची काळजी घ्यायलाही सांगितले. यावर बायको गॅलरीत गेली व सूर्य कोठे उगवला आहे, हे पाहू लागली. 

दुपारी जेवायला बसल्यानंतर भाजी खूपच खारट झाल्याचे जाणवले. तसे आम्ही म्हटल्यावर ‘मीठ बरोबर आहे. तुम्ही भाजीच कमी आणली होती. त्याला मी काय करू’ असे तिने उत्तर दिले. त्यावर मात्र आमचे टाळके सरकले. ‘‘तुझ्या माहेरी असल्या बेचव आणि खारट भाज्या खात असतील. आमच्याकडे नाही. आमची आई सुगरण आहे.’’ त्यानंतर पुढे काय झाले असेल, हे सांगायची खरंच गरज आहे का? पुढचा अर्धा तास ती आमच्या खानदानाचा आणि माझा उद्धार करीत होती. त्यानंतर मात्र ती खूपच फ्रेश वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी आली. रोज गोड गोड बोलून संसारात मिळमिळीतपणा येत असल्यास, अशा भांडणाचा झणझणीतपणा अधून- मधून असायलाच हवा, असे आमचे आता मत झाले आहे. तुम्हाला काय वाटते?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com