मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी

baba maharaj satarkar1.jpg
baba maharaj satarkar1.jpg

Wari 2020 : कोरोनाच्या साथीमुळे यंदा पंढरीची पायी वारी नाही, त्यामुळे वारकऱ्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पंढरीच्या वारीचे माहात्म्य आणि यंदा न होणाऱ्या वारीबाबत वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवरांचे विचार या मालिकेतून मांडण्यात येणार आहेत.

आषाढी वारी ही वारकऱ्यांची उपासना आहे. दिंडीची अथवा घराण्याची वारी ती सामुदायिक वारी असते; पण जन्माला येणाऱ्या प्रत्येकाची वारी स्वतंत्र असते. ही वारी देवासाठी नसते, ती देवाची वारी असते. त्यामुळे पंढरीच्या वारीची उपासना अगदी साधी आणि सोपी असली, तरी त्यातून मिळणारे आत्मिक समाधानाचे फळ हे जीवनाला तारून नेणारे असते. वारीत चालताना जो आनंद मिळतो, तो स्वर्गातील देवांनाही मिळत नाही. वारकऱ्याची वाट प्रत्यक्ष पांडुरंग पाहात असतो. या वारीत वारकऱ्याच्या कायिक, वाचिक, मानसिक अशा तिन्ही उपासना पूर्ण होतात. पंढरीच्या वारीत वारकरी परमानंद अनुभवतात. जो मनोभावे वारी करतो, त्याला तो परमानंद भरभरून मिळतो. त्याच आत्मिक आनंदाच्या ऊर्जेवर वारकरी पुढच्या वारीपर्यंत आयुष्याची वाटचाल करतो. म्हणूनच वारी हा परमोच्च आनंदाचा भक्तिप्रवाह आहे.

यंदा परिस्थिती निराळी आहे. जगभरात कोरोनानामक महामारीने थैमान घातले आहे. त्याच कारणाने सरकारला आषाढी पायी वारी रद्द करावी लागली, त्यामुळे आजमितीला मन बेचैन आहे. वारीच्या काळात निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीमुळे लाखो वारकऱ्यांना परंपरेच्या पायी वारीला मुकावे लागले. त्यामध्ये ना वारकऱ्यांचा दोष, ना सरकारचा... मग याबाबत दोष कोणाला द्यायचा? मला असे वाटते, प्रत्येक वारकऱ्याने सावळ्या विठुरायालाच जाब विचारावा. एकीकडे तू म्हणतोस ‘वाट पाहे भेटीची आवडे...’ आणि मग कशासाठी आम्हाला थांबविले? जीव झुरे तुझ्यासाठी... आम्हाला ही झुरणीची वारी का करायला लावतोय, याचा जाब पांडुरंगालाच विचारावा. कारण तोच कर्ता-करविता आहे. सध्या माझ्यासह लाखो वारकऱ्यांची मानसिक अवस्था वाईट आहे.

‘पंढरीची वारी’ हा शब्द मनात आला, तरी डोळे साथ देत नाहीत, आपोआप अश्रू डोळ्यांतून वाहायला सुरुवात होते. मी गेली ८४ वर्षे वारी करतो आहे. वर्षानुवर्षे भाविकांना वारी करा, असे सांगत आलो. यंदा मी स्वतःहून शेकडो लोकांना फोन करून सांगतोय, ‘बाबांनो, यंदा वारीला जाऊ नका.’ काय म्हणावे याला, पाप की पुण्य? त्यामुळे मला वाटते, याचा जाब प्रत्येकाने पंढरीश पांडुरंगाला विचारावा. यंदा कायिक वारीचा म्हणजे शरीराने चालत जाण्याचा विचार करू नये. मात्र, काकडा, हरिपाठ, जप, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेचे वाचन करीत ‘वाचिक वारी’ करणे आपल्या हातात आहे. मला खात्री आहे, प्रत्येक वारकरी आज घरात बसला असला, तरी तो मनाने अखंडपणे वारीच्या वाटेवर असेल. तीच त्याची मानसिक वारी आहे. ही उपासना करीत पुढच्या पायी वारीची वाट पाहूयात... राम कृष्ण हरी....
(शब्दांकन : शंकर टेमघरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com