टोलवाटोलवीने फुटणार कालवा?

उरुळी कांचन (ता. हवेली) - पांढरस्थळ परिसरातील बेबी कालव्याच्या भरावावरून वाहणारे पाणी. शेतकऱ्यांनी कालव्यावर मातीचा ढिगारा टाकल्याने कालवा फुटण्यापासून वाचला आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) - पांढरस्थळ परिसरातील बेबी कालव्याच्या भरावावरून वाहणारे पाणी. शेतकऱ्यांनी कालव्यावर मातीचा ढिगारा टाकल्याने कालवा फुटण्यापासून वाचला आहे.

उरुळी कांचन - पुणे महानगरपालिकेने जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात मागील चार दिवसांपासून क्षमतेपेक्षा जादा पाणी सोडले आहे. त्यामुळे बेबी कालवा लोणी काळभोर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन येथे ओसंडून वाहू लागला आहे. त्यातच कालव्यातील जलपर्णी व इतर गवतामुळे कालव्याचे पाणी कालव्याच्या थेट भरावावरून वाहू लागल्याने कालवा कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कालव्यातील पाण्याचे प्रमाण कमी करावे, अशी पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांनी वारंवार विनंती केली आहे. मात्र, खडकवासला पाटबंधारे विभाग व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवत पाणी कमी करण्यास असमर्थतता दाखवली आहे. 

पुण्यात दांडेकर पुलाजवळ नवा कालवा फुटल्याने झालेले नुकसान डोळ्यांसमोर असतानाच खडकवासला पाटबंधारे विभाग व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भांडणात बेबी कालवा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे उरुळी कांचन, कुंजीरवाडी व लोणी काळभोर परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. येत्या बारा तासांच्या आत बेबी कालव्यातील पाणीपातळी नियंत्रणात आणली नाही, तर लोणी काळभोरच्या रायवाडी परिसरात बेबी कालवा जेसीबीच्या मदतीने ओढ्यात फोडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याला दिला आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने पुणे शहरातील शुद्ध केलेले सांडपाणी मुंढवा जॅक्‍वेलमधून चार पंपांच्या मदतीने साडेसतरानळी ग्रामपंचायत हद्दीत बेबी कालव्यात सोडले जाते. या पाण्याचा उपयोग हवेली व दौंड तालुक्‍यातील शेतीसाठी केला जातो. मात्र, बेबी कालवा बरीच वर्षे बंद असल्याने त्याची मजबुती ढिसाळ व पोकळ झाल्याने सगळीकडे गळती होत आहे. त्यासाठी या कालव्याची मजबुती करणे अत्यंत आवश्‍यक आहे. मागील वर्षभरापासून मुंढवा जॅक्‍वेलमधून चार पंपाच्या साहाय्याने पाणी सोडण्यात आले. सुरवातीच्या काळात कालव्यात वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, मागील काही दिवसांपासून जॅक्‍वेलमधील पंपांची संख्या वाढविल्याने त्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले. त्यात जलपर्णीच्या अडथळ्याने दिवसेंदिवस कालव्याच्या परिसरात पाणीगळती वाढत आहे.

कालव्यालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक झाल्या आहेत. तसेच, कालव्याच्या परिसरातील घरांमध्ये पाणी पाझरत आहे.

कालव्यातून क्षमतेपेक्षा अधिक पाणी वाहत असल्याबाबतच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून आलेल्या आहेत. मात्र, अधीक्षक अभियंता संदीप चोपडे व महानगरपालिकेच्या पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद उंडे यांच्या आदेशानुसार क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडले जात आहे. पाणी कमी करण्यासाठी या दोन अधिकाऱ्यांकडे विनंती करूनही कारवाई होत नाही.
- पांडुरंग शेलार,  कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

पूर्व हवेलीमधील शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार पांडुरंग शेलार यांना पाणी कमी करण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत. याबाबतचा निर्णय शेलार यांनीच घ्यावयाचा आहे. पाणी कमी-जास्त करण्याचा व आपला काहीही संबंध नाही.
- संदीप चोपडे, खडकवासला पाटबंधारे विभाग

पाणी कमी करण्याबाबत शेलार यांच्याकडून सूचना आलेल्या आहेत. मात्र, खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप चोपडे यांनी पाणी कमी करण्याबाबत शेलार यांच्या सूचना मान्य करू नका, असा आदेशच दिलेला आहे. त्यामुळे चोपडे यांचा जोपर्यंत आदेश येत नाही, तोपर्यंत पाणी कमी करणे शक्‍यच नाही. 
- प्रमोद उंडे, कार्यकारी अभियंता, पुणे महानगरपालिका पाणी विभाग

बेबी कालव्यातून क्षमतेएवढे पाणी सोडण्यास एकाही शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र, सध्या पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी भेटून वस्तुस्थितीची माहिती दिलेली आहे. मात्र, अधिकारी महानगरपालिकेकडे; तर महानगरपालिकेचे अधिकारी पाटबंधारे खात्याकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. 
- सुनील बबन काळभोर, शेतकरी, लोणी काळभोर- रायवाडी (ता. हवेली)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com