पुणे - 'बालगंधर्व खऱ्या अर्थाने राजहंस होते. ज्या लोकमान्य टिळकांनी त्यांना बालगंधर्व म्हटले त्या टिळकांनी राष्ट्राची बांधणी केली. बालगंधर्वांच्या अंतःकरणात राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरली होती.
राष्ट्रभक्ती त्यांच्या गायकीची प्रेरणा होती,'' असे मत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आज येथे व्यक्त केले.
बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे नगरच्या गायिका धनश्री खरवंडीकर यांना "बालगंधर्व गुणगौरव' पुरस्कार डॉ. अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ आणि माजी सांस्कृतिक संचालक विश्वास मेहेंदळे आणि उद्योजक शैलेश शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखळकर, स. गो. कुलकर्णी, अनुराधा राजहंस आदी उपस्थित होते.
डॉ. अभ्यंकर म्हणाले, 'बालगंधर्व हे श्रुतींनी गाणारे गायक होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जगाने हेवा करावा असे कौस्तुभ रत्न सरस्वती देवीने बालगंधर्वांच्या रूपाने महाराष्ट्राच्या पदरात घातले.''
खरवंडीकर म्हणाल्या, 'कॅसेट किंवा सीडी ऐकून नाट्यसंगीत केवळ बसवता येते. मात्र त्यामध्ये जिवंतपणा येण्यासाठी आणि त्याचा आत्मा गवसण्यासाठी गुरूंकडून विद्या आत्मसात करणे आवश्यक आहे.''
'माध्यमांचा वापर करून काही खुजे कलाकार मोठे होत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे. स्व-स्तुतीत रमणारी ही पिढी आहे. पण इतक्या वर्षांनी देखील बालगंधर्वांचे स्मरण आपल्याला होत आहे, त्यातच त्यांचे मोठेपण आहे,'' असे डॉ. मेहेंदळे यांनी सांगितले.
नाशिकचे युवा संगीत नाटककार चिन्मय मोघे यांना "अण्णासाहेब किर्लोस्कर', जगदेव वैरागकर यांना "भास्करबुवा बखले' आणि पुण्याचे विद्यानंद देशपांडे यांना "डॉ. सावळो केणी' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
|