दौंड - राजकारणात नवनवीन प्रयोग, नवीन माणसाला वाव देणे आणि त्या माणसाच्या कर्तृत्वाला वाव द्यावा लागतो. बारामती लोकसभा मतदारसंघात परिस्थितीनुरूप बदल होतील पण उमेदवारी संबंधी निर्णय झालेला नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात कृषी महोत्सव २०२४ चे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व त्याप्रसंगी ते बोलत होते. महोत्सवाचे आयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे पुणे दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यासह बाळासाहेब गावडे, जालिंदर कामठे, वैशाली सणस, स्वप्नील शहा, आदी उपस्थित होते.
बारामती मतदारसंघात भाजप ऐवजी राष्ट्रवादी कॅांग्रेस (अजित पवार गट) कडून सुनेत्रा अजित पवार यांचे नाव पुढे येत असल्याबद्दल विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, 'राजकारण हे नेहमी प्रवाही असते. जसा पाण्याचा प्रवाहाच्या मध्ये अडसर आला नाही तर ते अतिशय शुध्द राहते. अडसर आला तर त्याची गटार होते.
त्यामुळे राजकारण देखील प्रवाही ठेवावे लागते आणि तुम्ही जर अडून राहिला तर राजकारण होत नाही. त्या त्या राज्यात आवश्यकतेप्रमाणे काही राजकीय समीकरण तयार होतात. पक्षाची आवश्यकता कमी असेल पण राज्याची आवश्यकता जास्त असेल तर बारामती मध्ये परिस्थितीनुरूप बदल होतील. पण अजून निर्णय झालेला नाही.'
पक्षात प्रतिक्रिया न देता थोडं दमानं घ्यायचे असतं.....
चंद्रकांत पाटील यांच्याकडे या वेळी जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या समर्थकांनी 'वासुदेव काळे यांना आमदार करा' अशी मागणी केली. त्याचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप मध्ये मागावं लागत नाही. मी स्वतः कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गिरणी कामगाराचा मुलगा आहे.
पक्षनेतृत्वाने दोन वेळा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली व राज्यात एका वेळी आठ खात्यांचा मी मंत्री होतो. पक्ष कार्य करीत असताना प्रतिक्रिया न देता पदासाठी थोडं दमानं घ्यायचे असतं. पक्षाकडून कार्यकर्त्याची दखल घेतली जाते आणि योग्य वेळी संधी दिली जाते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.