Baramati News: आता साहेब उभे नाही, मीही उभा नाही, चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या घरात आलेल्या सूनेला मत दयायच की मुलीला मत द्यायच हे तुम्ही ठरवा.
सुनेला मान असतो, तिला लक्ष्मी म्हटल जाते, सून घरात आल्यावर सासू सूनेच्याच हातात चाव्या देते ना, चुकल तर जरुर सांगा, आईच्या पोटातून कोणीच शिकून येत नाही, मलाही बोलता येत नव्हतच ना, पण संधी मिळाली की करुन दाखवलच ना....त्या मुळे भावनिक होऊ नका असे आवाहन शिर्सुफळ येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी केले.
अजित पवार म्हणाले, ही निवडणूक भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बारामती व माढा दोन्ही कडे लोकांनी निवडून दिले, नंतर त्यांनी राज्यसभेवर जायचा निर्णय घेतला, त्या नंतर पक्ष तुम्ही चालवा असे त्यांनी सांगितले, आम्ही त्यालाही मान्यता दिली.
नंतर काही घटना घडल्या, कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे, शेवटपर्यंत मला जे काही सांगितल गेल, तेच मी ऐकल, कुठही कमी पडलो नाही, साहेब फॉर्म भरुन जायचे, शेवटच्या सभेला यायचे आणि आपण सगळे काम करायचो.
आज परिस्थिती बदलली आहे, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार. पाण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न सोडविताना आपल्याला राज्यासोबतच केंद्राचाही निधी लागणार आहे, ही बाब सर्वांनी लक्षात घ्यायला हवी.
जर विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. सरकार पडल्यानंतर काम ठप्प झाली याचे बारामतीकर साक्षीदार आहेत, सत्ता नसेल तर विकास होत नाही, हे मतदारांनी विचारात घ्यायला हवे.
अनेक मोठ्या प्रकल्पांना मार्गी लावताना केंद्राची मदत घ्यावीच लागते, त्या साठी महायुतीच्या विचाराचा खासदार व्हायला हवा. सरकारच्या बाहेर राहीलो असतो तर आंदोलन, उपोषण, मोर्चा इतकच करायला लागले असते. मागे शिवसेनेसोबत जायला सांगितले आपण गेलो, भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला, त्यांच्या कारकिर्दीत ते जे म्हणतील ते केल.
मुख्यमंत्रीपदही आपण त्या काळात कॉंग्रेसला दिले. जे जे सांगितल ते ते ऐकल, आता भावनिक व्हायच नाही, वडीलधारी मंडळींच अंतःकरण जड होतय पण माझी त्यांना विनंती आहे की तुमच्या काळात पाणी आणता आल नाही आम्ही तो प्रयत्न करतोय. मी विकासासाठी मत मागतोय, सत्तेसाठी मत मागत नाही, बारामतीकरांनी मला भरभरुन दिलय, मी समाधानी आहे. जिरायत भागाचा कायापालट करायचा आहे म्हणून मत मागतोय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.