Vishwas Patil : सामाजिक विषमतेच्या वेदनेतून ‘अण्णा भाऊं’च्या साहित्याचा जन्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने आज पुण्यात एक दिवसीय पहिले साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य कला संमेलन आयोजित करण्यात आले होते.
Vishwas Patil
Vishwas Patilsakal

पुणे - समाजातील विषमतेच्या वेदनेतून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे अस्सल साहित्य जन्माला आलेले आहे. मात्र मराठी साहित्य जगताला अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा आवाका समजू शकला नाही. परिणामी महाराष्ट्राच्या साहित्य विश्‍वात अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे दुर्लक्षित राहिले, अशी खंत राज्यातील पहिल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य कला संमेलनाचे अध्यक्ष व पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी बुधवारी (ता.३) येथे बोलताना व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने आज पुण्यात एक दिवसीय पहिले साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य कला संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी यावेळी ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, राज्याच्या समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. दिनेश डोके, ‘बार्टी’च्या निबंधक इंदिरा अस्वार, साहित्यिक मिलिंद कसबे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट, गिरीश प्रभुणे, मच्छिंद्र सट्टे, सत्येंद्रनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.

विश्‍वास पाटील पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील रानवाटा तुडवत असताना अण्णा भाऊ साठे यांना जो अनुभव आला. या अनुभवातूनच त्यांच्या साहित्याची निर्मिती झालेली आहे. 'माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली'' हे शब्द त्यांनी कोण्या प्रेयसीला उद्देशून लिहिलेले नसून मुंबईत सांडलेल्या १०६ हुतात्म्यांच्या रक्ताच्या वेदनेतून स्फुरलेले त्यांचे हे काव्य आहे. त्यांनी महिलांच्या आयुष्याच्या गाभ्याला हात घालणारे विपुल साहित्य लिहिले.

एवढे विपुल, विस्तृत आणि काळजाला हात घालणारे लेखन करूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा विचार किंवा चर्चादेखील केली गेली नाही, ही खंत आहे. पंडित नेहरू आणि मोरारजी देसाई यांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याच्या कुटिल कारस्थानाला अण्णा भाऊ साठे यांनी लोकगीतांच्या माध्यमातून सुरुंग लावला. ते मातीतले साहित्यिक होते, हे त्यांच्या 'फकिरा' या कादंबरीतून स्पष्ट होते.’’

यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. दिनेश डोके, अंकल सोनवणे, गिरीश प्रभुणे, यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रास्ताविकात या संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. या संमेलन स्थळाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहित्यनगरी असे नाव देण्यात आले होते.

यानिमित्ताने ग्रंथमहोत्सव आणि चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय ग्रंथदिंडीही काढण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सविता इंगळे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com