'कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही दबणारे नाही'; फडणवीसांचे महाविकास आघाडीला आव्हान

Devendra_Fadnavis
Devendra_Fadnavis

पुणे : 'सरकार विरोधात बोललो तर गुन्हे दाखल करतात. तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा, शंभर चौकशा करा, आम्ही दबणारे नाहीत,' अशा शब्दात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिले. 'आम्ही सत्तेत होतो. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आमचीही टिंगल-टवाळी झाली, पण आम्ही असे कधी वागलो नाही,' असे फडणवीस म्हणाले. 

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारने चौकशी सुरू केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता.२५) फडणवीस यांनी "तुम्ही किती चौकशा करा, त्यातून काही निष्पन्न होणार नाही,' असे चॅलेंज दिले. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राहुल कुल, उमेदवार संग्राम देशमुख, यांच्यासह पुणे शहरातील पक्षांचे आमदार, नगरसेवक, सेलचे प्रमुख आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्धाच्या तासाच्या भाषणात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ही निवडणूक एका झाकी है. सरकारला या निवडणुकीच्या माध्यमातून शॉक देण्याची ही संधी आहे, असेही ते म्हणाले. 

राज्यात असलेले हे सरकार विश्वासघाताने आलेले सरकार आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात या सरकारविषयी रोष आहे. असे सांगून फडणवीस म्हणाले, "आमच्याकडे तुमच्या सारखी संपत्ती नाही. बंगले नाहीत. परंतु कार्यकर्ते हीच आमची संपत्ती आहे. त्यांच्या विश्‍वासघात झाल्याने ते आता पेटून उठले आहेत. शिवरायांचे हे मावळे तिन्ही पक्ष एकत्र आले, तर त्यांच्या पराजय केल्याशिवाय गप्प बसणार नाही.'' 

कोरोनानंतरची परिस्थिती बदलती आहे. बिहार आणि त्याबराबेरच देशभरात वेगवेगळ्या राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यातून पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावरील जनतेचा विश्‍वास वाढतो आहे. हा देशातील "मूड ऑफ नेशन' आहे. लोकांना कर्मयोगी नेता हवा आहे. बोलघेवडा नेते आवडत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना फडणवीस यांनी टोला मारला. ज्यांनी वीजबिल सवलतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विजेचा शॉक दिला; त्या सरकारला शॉक देण्याची या निवडणुकीच्या माध्यमातून वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही. या दृष्टीने आम्ही प्रक्रिया राबवली होती. परंतु, महाविकास आघाडीच्या सरकारने वेळकाढूपणा केला. घटनापीठा पर्यंत देखील हे पोहचवू शकले नाही. त्याचे खापर ओबीसींच्या नावाने भाजपवर फोडले जात आहे. परंतु, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधारी पक्षातील काही नेते करीत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com