रुईतील घोंगडीला आता शालींची ऊब

Ghaongadi
Ghaongadi

कळस (पुणे) : रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर देवाची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांकडून आवर्जून मागणी होत असते ती घोंगडीला. त्यामुळे येथील कारागिरांची घोंगडी बनविण्याची लगबग सुरू आहे. घोंगडीच्या जिवावर दिवाळी गोड करणाऱ्या या कारागिरांकडून सध्या वुलनच्या शाली बनविण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे. मेंढपाळांकडून रंगीबेरंगी वुलनच्या शाल खरेदी करण्यास प्राधान्य दिले जात असल्याने घोंगड्यांबरोबर आता येथे शाल तयार होऊ लागली आहे.

येथील काही कुटुंबे हातमागावर घोंगड्या बनवून विक्रीचा व्यवसाय करतात. हक्काचे चार पैसे रोजगार मिळवून देणारा हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र यांत्रिकीकरणाच्या काळात त्यांच्या या पारंपरिक व्यवसायावर गदा आल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. दिवाळी पाडव्याला भरणाऱ्या यात्रेमध्ये स्थानिकांबरोबर बाहेरून आलेल्या विक्रेत्यांची संख्या शंभराहून अधिक असते. यामुळे यात्रेत घोंगडी विक्रेत्यांची स्वतंत्र बाजारपेठ असते. एरवी दिवसाकाठी एक घोंगडी विनणारे कारागीर दिवसभरात दोन घोंगड्या विणत आहेत. यासाठी आता घरातील अन्य मंडळीही त्यांना मदत करताना आढळून येत आहे.

याबाबत माहिती देताना गणेश भारत भगत म्हणाले, ""घोंगड्या बनविण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र सध्या बाजारात परराज्यांतून मिलमध्ये तयार झालेल्या घोंगड्या दाखल झाल्याने, आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मिलमध्ये तयार झालेल्या घोंगडीच्या तुलनेत आमच्या हातमागावर तयार केलेली घोंगडी टिकून टिकाऊ आहे. परंतु स्वस्त मिळणाऱ्या घोंगडीकडे ग्राहक आकर्षित होतात. परिणामी सध्या गावातील अनेक कुटुंबांनी या व्यवसायाला फाटा देत, अन्य व्यवसायाची निवड केली आहे. काही ठराविक कुटुंबे आता हा व्यवसाय करतात. तर काही कुटुंबांनी घोंगड्यांबरोबर आता वुलनची शाल तयार करण्याच्या कामास प्राधान्य दिले आहे. मेंढपाळ वर्गाकडून या शाल मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात.''

"खादी ग्रामोद्योगाकडून मदतीची गरज'
थंडीच्या दिवसांत उबदारपणा देणारी शाल सध्या आमच्या कुटुंबाचा आधार बनली आहे. यात्रा-जत्रांच्या हंगामात या मालाला बाजारपेठ मिळते. आमच्याकडून व्यापारी ठोक पद्धतीने खरेदीसाठी येत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या उबदार कपड्यांची सध्या बाजारात रेलचेल असतानाही टिकावू, मजबूत अशा येथील आमच्या शाल व घोंगडीला अजूनही मागणी होताना दिसते. यात्रेत या घोंगड्यांची उलाढाल लाखोंच्या घरात असते. ग्रामीण भागातील या व्यवसायाला चालना देण्यासाठी व हातमागावर विणकाम करणाऱ्या या कुटुंबांच्या स्थैर्यासाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. याशिवाय खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे महत्त्वाचे असल्याचे मत गणेश भगत यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com