बालेवाडी : मुंबई बंगळूर महामार्ग येथे बालेवाडी परिसरातील सेवा रस्त्या लगत ता.१७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या दरम्यान एका रेनॉल्ड्स कंपनीच्या मोटारीने पेट घेतला. गाडीतून धूर येण्याचे लक्षात येऊन,गाडीतील पाच जण प्रसंग अवधान राखत वेळेत गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
कोथरुड येथील एम आय टी महाविद्यालयात शिकत असलेले ऋतुराज पाटील, तन्मय शेळके मूळ गाव बीड व त्याचे अन्य तीन मित्र ( वार - बुधवार,ता.१६) रोजी पर्यटनासाठी लोणावळा येथे गेले होते. तिथे जाण्यासाठी त्यांनी कोथरूड मधूनच एक गाडी भाडे तत्वावर घेतली होती. ही गाडी तन्मय चालवत होता.
लोणावळ्याला रात्री मुक्काम करून, ता.१७ रोजी सकाळी तिकडून येत असताना गाडीच्या बोनेट मध्ये आवाज आला म्हणून गाडी बाजूला घेऊन पाहिले असतं, गाडीचा बंपर निसटला होता. तो कसा बसा बांधून ही मुले मुंबई बंगळूर महामार्गाने कोथरुड कडे जात असताना वाकड जवळ गाडीतून जळका वास यायला लागला.
पुढे महामार्गालगत बालेवाडीकडे वळत असताना बोनेट मधून खूप धूर निघायला लागल्याने गाडीतील सर्व मित्र खाली उतरले, तेव्हड्यात गाडीने पेट घेतला. या मुलांनी जवळच एक चहाची टपरी होती तिकडून पाणी घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला, ही गाडी पेट्रोल वर चालणारी होती.पाणी टाकून आग जास्तच भडकली. वेळीच लक्षात आल्याने गाडीतून सर्वांना बाहेर पडणे शक्य झाले व कोणालाही ईजा झाली नाही.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाषाण केंद्र अधिकारी शिवजी मेमाने, फायर मन किसन तरपाडे, चंद्रकांत बुरुड, मदतनीस सौरभ पारखी, विशाल मधे, वाहन चालक शुभम करांडे यांनी तिथे जाऊन त्वरीत आग विझवली.
या घटनेत गाडी पूर्ण जळाली आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.या घटनेचा पंचनामा सुरु असून पुढील तपास चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.