satbara
satbaraesakal

Chakan News : चाकण परिसरात पुनर्वसनाच्या नावाखाली मोक्याच्या जमिनींचे सातबारे आणि घोटाळे; शेतकरी चिंताग्रस्त

चाकण परिसरातील नाणेकरवाडी, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, रासे, भोसे, काळुस या परिसरात मोक्याच्या जमिनींचे सातबारे काही जमीन खरेदी-विक्री करणारे एजंट करून घेत आहेत.

चाकण - चाकण परिसरातील नाणेकरवाडी, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, रासे, भोसे, काळुस या परिसरात मोक्याच्या जमिनींचे सातबारे काही जमीन खरेदी-विक्री करणारे एजंट करून घेत आहेत. काहींनी सातबारे तयार करून कोट्यावधी रुपयांना जमिनी विकल्या आहेत. यात काही टोळ्या सक्रिय आहे.

पुनर्वसनाच्या नावाखाली भामा -आसखेड धरण प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना काहीजण हाताशी धरायचे त्यांच्या नावाने या परिसरात मोक्याच्या जमिनी मिळवायच्या असा धंदा जमिनीची खरेदी-विक्री करणारे एजंट यांनी चालू केला आहे. चाकण परिसरात जमिनीच्या नोंदी होत आहेत.

त्यामुळे मूळ शेतकऱ्याचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी होऊन प्रकल्प बाधित शेतकऱ्याचे नाव येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे आम्ही काय करायचे असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून जमिनीचे मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत.

चाकण, ता. खेड परिसरात, खेड तालुक्यात काही जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांचा धंदा मात्र तेजीत आहे. ही जमीन नेमकी प्रकल्प बाधित शेतकऱ्याला की एजंटाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. एजंट त्या जमीनीचा सातबारा उतारा झाल्यानंतर ती जमीन तात्काळ कोट्यावधी रुपयाला विकत आहेत व कोट्यावधी रुपये कमवत आहे हे भयानक वास्तव आहे.

ज्याच्या नावाने प्रकल्प बाधित म्हणून जमीन मिळवली त्याला थोडाच लाभ मिळत आहे. भामा-आसखेड धरण प्रकल्प झाल्यानंतर त्या प्रकल्पामुळे अनेक गावातील शेतकरी प्रकल्प बाधित झाले. काही शेतकऱ्यांना सरकारी रक्कम, जमिनी मिळाल्या तर काही शेतकरी जमिनी तसेच मोबदल्यापासून अजूनही वंचित राहिले.

काही शेतकऱ्यांनी नुसता आर्थिक मोबदला घेतला तर काही शेतकऱ्यांना अजूनही आर्थिक मोबदला तसेच जमिनी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्प बाधित शेतकरी अजूनही काही मोबदल्याच्या व जमिनीच्या प्रतीक्षेत आहेत. काही प्रकल्प बाधित शेतकरी मात्र हुशार आहेत.

त्यांनी काही एजंटांना, काही नेते, कार्यकर्ते यांना हाताशी धरून व काही एजंटांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हाताशी धरून चाकण परिसरात मोक्याच्या जागी जमिनी मिळवल्या आहेत. यामध्ये नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, खराबवाडी, कडाचीवाडी, रासे, काळुस या परिसरात जमिनी मिळविल्या आहेत.

काही प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली एजंटांना, काही नेते, कार्यकर्ते, महसूल विभागाचे काही अधिकारी यांना हाताशी धरून चाकण परिसरातील अगदी रस्त्याच्या कडेला तसेच औद्योगिक वसाहतीतील मोक्याच्या जमिनी मिळविल्या आहेत. काहीजण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

चाकण परिसरात धरणाचा कालवा न झाल्याने तसेच या परिसराला धरणाचे पाणी न मिळाल्याने या परिसरातील जमीनी लाभ क्षेत्राखाली येत नसल्याने आम्ही जमीन देणार नाही असा शेतकऱ्यांचा पवित्रा आहे. यासाठी काही शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. काही शेतकऱ्यांची प्रकरणे मुंबई न्यायालयात प्रलंबित आहेत.

त्यामुळे मूळ शेतकरी प्रकल्प बाधितांना तसेच पुनर्वसनाच्या नावाखाली जमीन मागणाऱ्यांना ताबा देत नाही. काही जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मिळविल्या जात आहेत. त्यांचे तात्काळ सातबारे उतारे होत आहेत. त्या जमिनी मिळवून कोट्यावधी रुपयाला विकल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा विरोधात शेलपिंपळगाव येथील एका शेतकऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली व पुनर्वसनाच्या नावाखाली प्रकल्प बाधित शेतकऱ्याच्या नावाने झालेल्या सातबारा उताऱ्याची नोंद रद्द केली. याबाबत काळुस येथील रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुभाष पवळे यांनी सांगितले की, पुनर्वसनाच्या नावाखाली बाधित शेतकऱ्याच्या मोक्याच्या जमिनी मिळवून त्या जमिनीचा सातबारा उतारा काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने करायचा.

काही गुंड, एजंटाच्या टोळीने तसेच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनीचा सातबारा उतारा प्रकल्प बाधित शेतकऱ्याच्या नावाने केला आहे असे अनेक प्रकार घडले आहेत. जमीन लाभक्षेत्रात येत नाही. तरी ती जमीन पुनर्वसनाच्या नावाखाली प्रकल्प बाधित शेतकरी म्हणून त्या व्यक्तीला देण्यात येत आहे. हा अनेकांवर झालेला अन्याय आहे.

या अन्यायाच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागून या सातबारा उताऱ्यावरील नोंद रद्द करणार आहे. याबाबत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले की,' भामा- आसखेड धरण प्रकल्पाचा कालवा या परिसरातून रद्द झालेला आहे.

लाभक्षेत्र या परिसरात येत नसल्याने तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी मिळत नसल्याने लाभक्षेत्राचा शिक्का या परिसरातील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरून काढून टाकण्यात यावा ही मागणी शासनाकडे, मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे मी दाद मागितली आहे. लाभ क्षेत्रात या परिसरातील जमिनी येत नसल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्प बाधित पुनर्वसनासाठी देऊ नयेत. जमिनी बळकवण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. हा शेतकऱ्यावर अन्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com