कोरोनानंतर आता आव्हान दृष्टी वाचविण्याचं

World-Eye-Donate-Day
World-Eye-Donate-Day

पुणे -  प्रत्येक महिन्या-दोन महिन्यात डोळ्यात इंजेक्‍शन घेतलं तरच जग पाहू शकणाऱ्या आजी आहेत. लॉकडाउनमुळे त्या घराबाहेर पडल्या नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी डोळ्यात इंजेक्‍शन घेतलेच नाही. आता त्यांची दृष्टी वाचविण्याचे मोठे आव्हान नेत्र तज्ज्ञांपुढे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यासह देशात गेल्या महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. या दरम्यान रुग्णांनी नियमित नेत्र तपासणीकडे पाठ फिरवली. त्यामुळे सुरू असलेल्या उपचारांना करकचून ब्रेक लागला. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. रुग्ण पूर्ववत रुग्णालयात येत आहे. 

पण, सहा महिन्यांमध्ये आजार वाढला आहे. आता एकेका रुग्णाची दृष्टी वाचविण्यासाठी नेत्ररोग तज्ज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे चित्र पुण्यात दिसते. जागतिक दृष्टिदान दिनानिमित्ताने ही माहिती पुढे आली. 

उपचार का थांबतात?
‘परवडतं नाही’, या एकाच कारणाने ४१ टक्के रुग्णांमध्ये हे उपचार थांबत असल्याचा निष्कर्ष ‘इंडियन जर्नल ऑफ ऑफथेलमोलॉजि’मध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. ‘एनआयओ’चे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफथेलमोलॉजि) नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांच्यासह डॉ. रोहित शेट्टी, डॉ. जाई केळकर, डॉ. निखिल लाभटेवार, डॉ. अभिषेक पंडित, डॉ. माधुलिका मालोदे आणि डॉ. सायली तिडके या संशोधनात सहभागी होते. 

हे इंजेक्‍शन चार ते पाच प्रकारात उपलब्ध आहे. त्याची किंमत १० ते ४० हजार रुपयांपर्यंत आहे. पहिल्या काही इंजेक्‍शननंतर दृष्टी सुधारते. पण, ही सुधारलेली दृष्टी स्थिर होण्यासाठी पुढील इंजेक्‍शन घ्यावी लागतात. पण, या इंजेक्‍शनचा वर्षाचा खर्च किमान ८० हजारांपर्यंत जातो. त्यामुळे रुग्ण हा खर्च टाळण्यासाठी इंजेक्‍शन घेत नाहीत, असे यातून स्पष्ट होते. 

‘या आजाराच्या बहुतांश रुग्णांचे वय ६०-७० वर्षांपेक्षा जास्त असतं. ते उपचार अर्धवट सोडतात. त्यातून दृष्टी कमी होते. त्यानंतर पुन्हा इंजेक्‍शन सुरू करूनही काही रुग्णांमध्ये दृष्टी सुधारत नाही,’’ असेही डॉ. आदित्य केळकर यांनी सांगितले. 

असं केलं संशोधन
- जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१७ दरम्यानच्या ६४८ रुग्णांचा अभ्यास.
- त्यात ६५ टक्के पुरुष तर, ३५ टक्के महिलांचा समावेश.
- ५८ टक्के रुग्ण मधुमेही
- ५६ टक्के उच्च रक्तदाब
- या रुग्णांनी उपचार पूर्ण केले नसल्याचं विश्‍लेषण यात केलं

डोळ्यात इंजेक्‍शन का घ्यावे लागते ?
नेत्र पटलाच्या वरच्या बाजूला व्हीईजीएफ (अँटी-व्हॅस्कुलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्‍टर) नावाचा घटक असतो. डोळ्यातील जेलीमध्ये या घटकाचं प्रमाण वाढल्याने वयामुळे झीज वेगाने होते. तसेच, मधुमेहामुळे नेत्रपटलला सूज येते. किंवा डोळ्याच्या आतील रक्तवाहिनी फुटल्यानेही नेत्रपटल सूजते. त्यामुळे डोळ्यातील व्हीईजीएफचं प्रमाण वाढतं. ते कमी करण्यासाठी डोळ्यात इंजेक्‍शन घ्यावं लागतं. इंजेक्‍शनचा परिणाम संपल्यावर ही सूज पुन्हा येते. त्यामुळे हे इंजेक्‍शन नियमित घ्यावे लागते. 

अँटी-व्हीईजीईमध्ये वेळेत उपचार सुरू करणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकंच त्यात सातत्य ठेवणेही गरजेचे ठरते. नेत्रतज्ज्ञांकडून नियमित तपासणी आवश्‍यक असते. खर्च, दृष्टी सुधारत नाही, प्रकृती अस्वास्थ्य अशा कारणांमुळे यात सातत्य राहात नाही. हाच ज्येष्ठ नागरिकांची दृष्टी वाचवण्यातील मोठा अडथळा आहे, असा निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे.
- डॉ. आदित्य केळकर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com