मुलाचा जीव जाऊनही पालिकेत फक्त चर्चाच

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - पतंग उडविताना पाण्याच्या टाकीत पडून मुलाचा जीव जाण्याच्या घटनेचे गांभीर्य पालिकेसाठी चौकशी, नोटिसा आणि कारवाईच्या आश्‍वासनापुरते मर्यादित असल्याचे सर्वसाधारण सभेतील चर्चेवरून सोमवारी दिसून आले. 

सर्वसाधारण सभेत सदस्यांनी या पाण्याची टाकीच्या दुरवस्थेवरून अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत, या घटनेला तेच जबाबदार असल्याचा सूर आळवला. त्यानंतर घटनाच कशी घडली? त्या रोखण्याचे उपाय? यावर ठोस भूमिका घेण्यापेक्षा निव्वळ चर्चेतच विषय गुंडाळण्यात आला. अखेर चर्चेच्या शेवटी महापालिकेच्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेतून मृत मुलाच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला.  

वडगाव (बु) येथील महापालिकेच्या पाणी टाकीवर जाऊन पतंग उडविणाऱ्या अथर्व गोरे (वय ११) या मुलाचा रविवारी मृत्यू झाला होता. टाकी परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने ही घटना घडल्याचा मुद्दा मंजूषा नागपुरे यांनी उपस्थित केला. त्यानंतर सभागृह नेते धीरज घाटे, विशाल तांबे, हरिदास चरवड यांच्यासह काही सदस्यांनी अशा घटनांचे गांभीर्य मांडून खुलाशाची मागणी केली. यावर ‘टाकीच्या परिसरातील सुरक्षारक्षकाच्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस दिली आहे,’ असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी सांगितले. तेथे ‘सीसीटीव्ही’ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

त्यानंतर या घटनेच्या अनुषंगाने मनसेचे वसंत मोरे, काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी सुरक्षारक्षकांचा मुद्दा मांडला. त्यावर चर्चा सुरू झाल्याने मुलाच्या मृत्यूवरील चर्चा मागे पडली. तेव्हा सुरक्षारक्षक, संबंधित विभागाची जबाबदारी, त्याच्या बंदुका, त्यांचे स्वरूप यावर चर्चा रंगली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com